वाराणसी, 4 मे (हिं.स.)।१२८ वर्षीय योग गुरु स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी शनिवारी (दि.३) रात्री ८.४५ मिनिटांनी जगाचा निरोप घेतला आहे.श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील ३ दिवसांपासून ते बीएचयु येथे उपचार घेत होते. शिवानंद बाबा यांच्या निधनानं वाराणसीत शोककळा पसरली आहे. शिवानंद बाबा यांचे अनुयायी देशविदेशात आहेत. त्यामुळे शिवानंद बाबांच्या अखेरच्या दर्शनासाठी त्यांचे पार्थिव दुर्गाकंड इथल्या आश्रमात ठेवले जाणार आहे. सोमवारी शिवानंद बाबा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः शिवानंद बाबांच्या योगाभ्यासाचे अनुयायी होते. ३ वर्षापूर्वी केंद्र सरकारने शिवानंद बाबा यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले होते. अलीकडेच प्रयागराज येथे शिवानंद बाबा यांचा कॅम्प लागला होता. त्यांनी महाकुंभ येथे जात पवित्र स्नानही केले होते. ८ ऑगस्ट १८९६ साली शिवानंद बाबा यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांच्या कुटुंबात ४ जण होते. ते, आई वडील आणि मोठी बहीण असं त्यांचं कुटुंब होते. भिक्षा मागून त्यांचे कुटुंब उदरनिर्वाह करायचे. काही दिवस असेच गेले, कालांतराने कुटुंबासमोर अडचणी आल्या. घरात खाण्यासाठीही पैसे शिल्लक नव्हते तेव्हा आई वडिलांनी चिमुकल्या शिवानंद यांना वयाच्या ४ व्या वर्षी बाबा श्री ओकारनंद गोस्वामी यांच्याकडे सुपूर्द केले, जेणेकरून त्याचा सांभाळ नीट होईल. लहानपणापासूनच शिवानंद यांनी गुरूंकडे राहून शिक्षण घेणे सुरू केले.
भूकेमुळे शिवानंदच्या आई वडिलांसह बहिणीचा मृत्यू झाला. त्यानंतर शिवानंदची संपूर्ण जबाबदारी बाबा ओंकारनंद यांनी घेतली. शिवानंद कधीही शाळेत गेले नाहीत. गुरूकडे राहून व्यावहारिक ज्ञान आणि शिक्षण घेतले. गुरूंकडून त्यांनी योग शिक्षण घेतले. वयाच्या ६ व्या वर्षीपासून ते योगा करत होते. जगभ्रमंती करून योग साधना करण्याचे गुरूंनी आदेश दिले त्यानंतर जवळपास ३४ देशात ते फिरले. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांनाही शिवानंद बाबा यांनी जवळून पाहिले.
ते परदेशात राहायचे परंतु त्यांचे मन भारतात होते. त्यासाठी १९७७ साली ते वृंदावनला आले. इथे येऊन त्यांनी भारत भ्रमंती केली. जागोजागी जात लोकांना योग शिकवला. अखेरच्या काळात ते वाराणसीत स्थिरावले.