लखनौ : वरातीहून घरी निघालेल्या कुटुंबियांवर काळानं घाला घातला. भरधाव बोलेरो आणि ट्रक यांच्यात भीषण धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की बोलेरो ट्रकच्या पूर्ण खाली गेली होती. या गाडीचा चुराडा झाला होता. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
नबाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेखपूर गावात विवाह सोहळ्याला सर्वजण उपस्थित होते. तिथून पुन्हा घरी मिरवणूक संपवून येत असताना काळानं घाला घातला. या अपघातामध्ये सहा चिमुकल्यासह तब्बल 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील प्रतापगडच्या माणिकपूर पोलीस ठाण्यातील देशराज इनारा येथे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.
रात्री उशिरा परतत असताना बोलेरो कारची रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला धडक बसली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार चालकाला झोप आल्याने गाडीवरचे नियंत्रण सुटलं आणि अपघात झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कारमधील सगळे लग्न समारंभातून घरी परतत होते. यावेळी अपघात झाल्याने तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 6 बालकांचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी 2 तास लागले. अपघातातील मृतांमध्ये 12 जण हे कुंडा कोतवालीच्या जिगरापूर चौसा गावातील आहेत. तर बोलेरो कार चालकासह दोन जण हे कुंडा परिसरातील राहणारे आहे. बाकी इतर गावातीलही प्रवासी गाडीमध्ये होते.
पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेहांना ताब्यात घेतलं असून शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. यावर पोलीस अधिक तपास करत असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हा अपघात खूप भीषण होता. बोलेरो कार ट्रकच्या खाली गेली होती आणि चुराडाही झाला होता. त्यामुळे ही कार क्रेनच्या मदतीनं बाहेर काढावी लागली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले.