मूळचा सोलापूरकर भोळसट नाही. सध्या सोलापुरात नेमके कोण रहात आहे हेच समजत नाही. जो राहतो त्याला सोलापूरकर म्हणावयाचे का हा एक मोठा प्रश्न आहे. छोट्या-मोठ्या कौतुकाने भारावून जाणारा, केलेल्या कौतुकामुळे लाजेने चूर होणारा आणि आत्मभान हरवलेला सोलापूरकर सध्या सर्वत्र दिसतो आहे. विशेषतः राजकीय क्षेत्रातील सोलापूरकर असाच बनलेला आहे.
काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सोलापूर शहरास भेट झाली. ही भेट पालकमंत्र्यांच्या विनंतीवरून झाली. सोलापुरातील कोरोना विषाणूच्या लढाई विरोधात जी काही स्थिती आहे ती समाधानकारक नाही. त्या संदर्भात पालकमंत्र्यांनी साहेबांना सोलापूर भेटीचे निमंत्रण दिले होते. असा खुलासा साहेबांनी केलेला आहे. खरेतर पालकमंत्र्यांची अशी विनंती सोलापूरकरांना संतापजनक वाटावयास हवी. खाजगी तथा सरकारी रुग्णालयातून कोरोनाच्या विरोधात लढा देत असताना, ज्या काही अडचणी येत आहेत, जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत, त्याबाबत राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपले अहवाल देणे अपेक्षित असते. त्यांच्याशी चर्चा करून व्यवस्था पाहणे अपेक्षित असते.
तांत्रिक दृष्ट्या मुख्यमंत्री पालकमंत्र्यांची नेमणूक केलेली असते. दुर्दैवाने आपल्या जबाबदाऱ्या नेमक्या काय आहेत, कोणापाशी आहेत, याचे भान आमच्या पालकमंत्र्यांना नाही. त्यांना भानावर आणायची जबाबदारी पक्षप्रमुख म्हणून शरद पवार यांची होती व आहे. हे काम शरद पवार यांनी केले नाही. सोलापुरात आल्यावर, मी सरकारी पक्षात नाही, ही माझी जबाबदारी नाही. मी फक्त माहिती घेण्यासाठी आलो आहे. पालकमंत्र्यांच्या विनंतीवरून आलो आहे, अशा प्रकारचे वक्तव्य शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतून दिसून आले. सोबत सोलापूरच्या आमदार प्रणिती ताई शिंदे यांचा दूरध्वनी आला होता. याचाही संदर्भ साहेबांनी दिलेला होता व आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाने सोलापुरकर मरतो आहे. सोलापूरकरांचे जीवन धोक्यात आले आहे. सोलापूरकर हवालदिल झालेला आहे. याचे कोणालाच गांभीर्य दिसून येत नाही. सोलापूरकरांची या संकटातून कशी मुक्तता करावयाची यावरचे काही भाष्य दिसून आले नाही. सोलापूर ला दहा दिवसाचा लॉकडाऊन काय केला याचा जाब साहेब विचारणार होते त्यावर कोणीच भाष्य केले नाही. ना साहेबांने. ना प्रशासनाने. सोलापूर शहरात चिंतेचे वातावरण असताना, प्रत्येक राजकीय पक्षाच्या अंगात, आपला खेळ मांडण्याचे जे धारिष्ट येते, ते येथील जनता झोपलेली आहे, निद्रिस्त आहे यामुळेच येत आहे.
लोकशाही राज्यकारभारात प्रसारमाध्यमांवर जबाबदारी आहे. प्रसारमाध्यमांत कार्यरत असणारा पत्रकार हा त्यातील जबाबदार घटक आहे. खरे तर तो रात्रंदिवस सोलापूरच्या परिस्थितीचे, वास्तवाचे वार्तांकन करतो आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून हे सारे काम तो करतो आहे. त्याचेही कौतुक करावयास हवे. नाही असे नाही. पत्रकाराने जागल्याची भूमिका करावी असे सांगितले जाते. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातून हेच शिकविले जाते. याबाबत दुमत असण्याचे कारण नाही.
अशा परिस्थितीत सरकारी तथा राजकीय माध्यमातून जे जे नेते आणि जबाबदार अधिकारी सोलापुरात येत आहेत, त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे. वास्तव काय आहे, येथील जनतेची दुःखे काय आहेत, येथील उपचारात कमतरता काय आहे असे सगळे प्रश्न पत्रकारांनी मोठ्या धारिष्ट्याने विचारावयास हवे असतात. जर पत्रकारांनी वास्तव समोर आणले नाही, सरकारपुढे मांडले नाही, तर अशा पत्रकारितेला काही अर्थ उरत नाही.
काल शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेचे वार्तांकन तीन-चार वेळा नजरेखालून घातले. मॅच फिक्सिंग नावाचा जो प्रकार क्रिकेट क्षेत्रात असतो, तसाच काहीसा प्रकार या पत्रकार परिषदेत असावा असे निदर्शनास आले. जर आपण जबाबदार नाही आहोत, सरकारी पक्षाचे घटक नाही आहोत, तर अशा गंभीर आणि कठीण परिस्थितीमध्ये सोलापुरात येऊन येथील यंत्रणेला वेठीला धरावयाचे काही कारण नव्हते. सध्याची परिस्थिती राजकीय बॅटिंग खेळावयाची नाही आहे. साहेबांना उलट प्रश्न विचारलेले चालत नाहीत असे सांगण्यात येते. कोणी असे प्रश्न विचारलेच तर अशा पत्रकाराला, पत्रकार परिषदेतून थेट हाकलून देण्याची कार्यपद्धती अमलात आणली जाते असे कळते आहे. असे जर असेल तर ही कार्यपद्धती निषेधार्ह आहे. कदाचित यामुळेच काल कोणी पत्रकारांनी नेमके प्रश्न पत्रकार परिषदेत विचारले नसावेत असे दिसते आहे.
सगळ्यात संतापजनक गोष्ट होती, ती म्हणजे या पत्रकार परिषदेत होऊ घातलेल्या राममंदिराच्या संदर्भातील प्रश्नाची. अयोध्येतील राम मंदिर सोलापूरच्या शिवारास लागून नाही. त्यामुळे तेथे हे मंदिर बांधले गेले काय आणि नाही बंद केले काय याचा सोलापूरच्या परिस्थिती वरती काहीही परिणाम होणारा नाही. साहेबांच्या सोलापूर भेटीत हा विषय निघण्याचे कारण नव्हते. कारण सोलापूरची भेट ही विशेष कारणासाठी आणि विशेष निमंत्रणावरून आखण्यात आलेली होती असे सांगण्यात आलेले आहे.
सध्याच्या परिस्थितीत शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणेत काही बदल घडणार आहे का नाही?सोलापूर करांचे वैद्यकीय जीवन सुसह्य होणार आहे का नाही?. हे सोलापूरकरांना समजणे आवश्यक होते. सोलापूरकरांना योग्य उपचार मिळणार आहेत का नाहीत? सध्याची परिस्थिती सुधारणार आहे का नाही? हे समजणे आवश्यक होते.
प्रशासनावरती पकड असणारा, प्रशासनातील बारकावे माहित असणारा अनुभवी आणि अभ्यासू नेता अशी शरद पवार यांची ओळख आहे. आपण काहीतरी सोलापूरकरांना देणे लागतो अशी भावना त्यांच्या बोलण्यातून दिसून आली. मग सोलापूर भेटीतून सोलापूरकरांना काय दिले. सोलापूरकरांचे कोणते देणे फेडले. हे कालच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झालेले नाही. याउलट राम मंदिराच्या संदर्भातील अनावश्यक प्रश्नांना उत्तरे देऊन वातावरण गढूळ करण्याचे काम झाले आहे. सोलापूर शहराचा वापर राजकीय आखाडा म्हणून वापरला गेलेला आहे. प्रश्नांना उत्तरे कशी टाळावे हे साहेबांना शिकवण्याची आवश्यकता नाही. हे काम राम मंदिरातील प्रश्नासंदर्भात त्यांना करता आले असते. सोलापुरातील प्रश्न गांभीर्याने हाताळता आले असते. परिस्थिती तशीच आहे. पण तसे झालेले दिसत नाही.
कोरोनाविषाणू संकटानंतर सोलापूर प्रगतीशील कसे होईल याबाबत ना कोणी प्रश्न विचारले ना त्याबद्दल कोणी भाष्य केले. त्याबाबत काही नियोजन आहे की नाही याबाबतही प्रश्न विचारला गेला नाही. सोलापूरकर जगले काय आणि मेले काय याचे कोणालाच स्वारस्य दिसत नाही. सोलापूरच्या प्रगतीबाबत ही कोणाला स्वारस्य दिसत नाही.
सोलापूरच्या भुमीवरती केवळ राजकीय खेळ मांडला गेला आहे. त्याचा ना सोलापूरकरांनी निषेध केला. ना त्यावर पत्रकारांनी भाष्य केले. पत्रकार परिषदेमध्ये सोलापूरचे जे कौतुक केले गेले त्यामुळे सारे भारावून गेलेले दिसत आहेत. या कौतुकाच्या ओझ्याखाली दबले गेलेले दिसत आहेत. अशा कौतुकाने सोलापूरची प्रगती होणार नाही. सोलापूरकरांना हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचा, नादी लावण्याचा उत्तम प्रयोग काल पार पडलेला आहे.
सोलापूरकर आणि सोलापुरातील पत्रकार अशा परिस्थितीत झोपलेले आहेत, का झोपावयाचे सोंग घेत आहेत हे कळत नाही. कोरोनाविषाणूच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी साहेब आपण काय करणार आहात असा थेट प्रश्न विचारला गेला नाही. यामुळे जागल्याच्या भूमिकेचे काय झाले असा प्रश्न विचारल्या शिवाय रहावत नाही. मी सरकारात नाही आणि ही माझी जबाबदारी नाही म्हणून हात झटकण्याचा साहेबांचा उत्तम कार्यक्रम काल पार पडला व या कार्यक्रमात सोलापूरचे पत्रकार सहभागी होते असेच म्हणावे लागेल.
अशाने सोलापूर सुधरायचे नाही हे लक्षात घ्या. सोलापूरकरांनो तुम्ही थंडच रहा. तुम्हाला पुसतो कोण. तुमच्या शहराच्या भूमीचा वापर आम्ही मनात येईल तसा करू. याबाबत तुम्हाला बोलायचा अधिकार नाही अशीच काहीशी समजूत राजकीय नेत्यांची झालेली दिसते आहे. सोलापूरकरांची अस्मिता कोणत्या सावकाराकडे गहाण टाकली गेलेली आहे याचा शोध घ्यावा लागेल असे दिसते आहे.
श्रीनिवास माधवराव वैद्य
चार्टर्ड अकाउंटंट
भ्रमणध्वनी क्रमांक-९४ २०२ ६५६५६