सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व्यापक प्रमाणात प्रयत्न करीत आहे. सोलापूर शहरातील रूग्णसंख्या कमी होत असून ग्रामीण भागात वाढत आहे. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंटवर भर देऊन ग्रामीण भागातील मृत्यूदर वाढू देऊ नका, असे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
जिल्हा नियोजन भवनमध्ये कोरोना विषाणूच्या आढावा बैठकीत महसूलमंत्री थोरात बोलत होते. यावेळी महिला व बाल विकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महापालिका आयुक्त शिवशंकर यांनी शहरातील तर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी ग्रामीण भागातील कोरोना स्थितीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जिल्ह्यात रूग्णसंख्या वाढत असली तर सर्व प्रकारच्या उपचारासाठीचे नियोजन केले असून 23 हजार रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. 65 कोविड केअर सेंटरमध्ये 8715 ची क्षमता असून 20 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 1046 तर 11 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 1058 रूग्णांची क्षमता आहे. सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणखी 120 बेडची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती श्री. शंभरकर यांनी दिली.
महसूलमंत्री थोरात यांनी ‘कोरोनाचे संकट ऐतिहासिक आहे. राज्यात परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे संसर्ग वाढत आहे. मुंबई कंट्रोलमध्ये असले तरी इतर शहरात संसर्ग वाढत आहे. सोलापूर शहरात सध्या रूग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. ही आनंदाची बाब आहे. ग्रामीण भागातील तपासणी चाचण्यांचा वेग वाढविल्याने रूग्णसंख्या वाढत आहे. रूग्ण वाढले तरी नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, जिल्हा प्रशासनाने रूग्णांवर वेळेत उपचार करून मृत्यूदर आटोक्यात ठेवण्यावर भर द्यावा. पुढील 100 दिवसांचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे’.
महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी पुरूष मोठ्या प्रमाणात कामानिमित्त बाहेर जातात. त्यांना संसर्ग झाल्यास घरातील इतरांनाही बाधा होते. महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्याने त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याच्या सूचना ॲड. ठाकूर यांनी केल्या.
पालकमंत्री भरणे यांनी सांगितले की, जिल्ह्यात 10 हजार 209 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. यापैकी 517 मयत झाले असून 6675 रूग्ण बरे होऊन घरी गेले तर 3017 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाला सर्व बाबतीत नागरिकांचे सहकार्य मिळत असून कोविड हॉस्पिटल, आरोग्यातील रिक्त पदे, औषधे, ॲम्ब्यूलन्ससाठी सहकार्य करण्याची अपेक्षा श्री. थोरात यांच्याकडे केली.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, सहायक अधिष्ठाता डॉ. श्रीमती जयस्वाल, अग्रजा वनेरकर, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, डॉ. मंजिरी कुलकर्णी, पोलीस उपायुक्त बापू बांगर, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, स्नेहल भोसले, मोहिनी चव्हाण, दीपक शिंदे आदी उपस्थित होते.