बार्शी : भुयारी गटार योजनेसाठी खोदलेल्या रस्त्यावरील मातीमिश्रित मुरुमामुळे शहरातील बहुतांश रस्ते चिखलात बुडाले आहेत. या रस्त्यावरुन वाट काढणार्या पादचारी आणि दुचाकीस्वारांची चिखलात घसरगुंडी होत आहे. शहरातील रस्ते चिखलात बुडाले असून संतप्त नागरिकांनी सोशल मिडियावर नगरपालिकेला लक्ष्य केले आहे.
नागरिकांना अत्यावश्यक कामासाठीही घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. गेल्या दोन वर्षापासून पावसाळ्यात शहरात होत असलेल्या या त्रासामुळे वैतागलेले नागरिक सोशल मिडियावर नगरपालिकेला लक्ष्य करत आहेत. नगरपालिकेच्या कारभारावर उपहास आणि टिकेचा भडीमार होत आहे. भुयारी गटर योजना बंद पडल्यामुळे नजिकच्या काळात तरी या त्रासातून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शहरातील बहुतांश भागात भुयारी गटर योजनेचे पाईप टाकण्यासाठी रस्ते मधोमध खोदण्यात आले आहेत. त्यापैकी बाजारपेठेतील रस्त्यांचेच फक्त घाईघाईत डांबरीकरण करण्यात आले आहे. बाकीचे रस्ते मात्र तसेच सोडून देण्यात आले आहेत. बाजारपेठेतील व्यापार्यांनी खराब रस्त्यामुळे आमच्या व्यवसायांवर परिणाम होतो, म्हणून लवकर रस्ते नीट करा, असा गलका केला. परिणामी त्यांचे रस्ते लगेच तयार झाले.
शहराच्या चोहोबाजूने विस्तारलेल्या वस्तीतील हजारो नागरिक मात्र तसे सोशिक आहेत. ते बिचारे रस्ते उखडून ठेवले काय किंवा बंद केले काय, सोसतच राहतात. त्यामुळे नगरपालिकेला त्यांच्या समस्यांची दखल घ्यावीशी वाटत नाही. परिणामी दोन वर्षे झाली, त्यांचे रस्ते तसेच ओबडधोबड, उखडलेले राहिले आहेत. खेादकाम झालेल्या भागाने रस्त्यांची पार रया घालविलेली आहे. केवळ मुख्य रस्तेच नव्हे तर गल्लीबोळातील रस्त्यांचीही वाट लागलेली आहे. खोदलेला भाग बुजवितानाही नीट काळजी घेतली गेली नाही. त्यामध्ये मातीयुक्त मुरुमाचा वापर करण्यात आला आहे. भर टाकताना नीट दबाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्त्यांची लेव्हलच राहिलेली नाही. खोलगट भागात चाके रुतुन वाहने फसत आहेत.
पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांवर होणार्या सततच्या वाहतुकीमुळे धुराळा उडून नागरिक खूप त्रस्त झाले होते. आता पावसाळ्यात या रस्त्यावर सर्वत्र चिखल साठला आहे. या चिखलातून चालणे तसेच दुचाकी चालविणे जिकिरीचे झाले आहे. विशेषत: लहान मुले, महिला, वृध्दांना चिखलमय रस्त्यातून मार्ग काढणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यावर घसरगुंडी तयार झाली आहे. त्यातून पादचारी आणि दुचाकीस्वार घसरुन पडत आहेत. खूप त्रास झाल्यानंतर काही नागरिक आपला संताप सोशल मिडियावर नगरपालिकेवर टिकेचा भडीमार टाकणार्या पोस्ट टाकून व्यक्त करत आहेत. मात्र नगरपालिकेला अजूनही जाग आलेली नाही.