औरंगाबाद : औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरु आहे. तीन महिन्यांपासून पगार थकल्यामुळे निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. निवासी डॉक्टरांचे वैद्यकीय अधिक्षक कार्यालयासमोर निदर्शने सुरु आहेत. रुग्णालय प्रशासनाविरोधात डॉक्टरांची घोषणाबाजी सुरु आहे.
नुकतेच राज्यसरकारने निवासी डॉक्टराच्या विद्यावेतनात दहा हजारांने वाढ केल्याचे जाहीर केले. मात्र येथे तर तीन महिन्यापासूनच कोरोनात जीव धोक्यात घालून काम करुन पगार मिळत नाही. त्यासाठी डॉक्टरांना आंदोलन करावे लागणे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात 490 निवासी डॉक्टरांचे तीन महिन्यांपासून पगार थकले आहेत. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. तीन महिन्यांचा पगार तातडीने द्या, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह विदर्भातून रुग्ण येतात. या रुग्णांवर निवासी डॉक्टरांकडून उपचार केला जातो. आंदोलन करणाऱ्यांपैकी बरेचसे डॉक्टर कोरोना रुग्णांवरदेखील उपचार करत आहेत. तर काही डॉक्टर इतर आजारांवर उपचार करत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना संकटकाळात स्वत:चा जीव धोक्यात टाकून डॉक्टरांकडून रुग्णसेवा सुरु आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून घाटी रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांना पगार मिळाला नाही. याआधी डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावेळी प्रशासनाकडून डॉक्टरांना रक्कम जमा झाली असून लवकरच पगार होईल, असं आश्वासन देण्यात आलं. मात्र, अद्यापही डॉक्टरांचा पगार झालेला नाही.
“पगार होत नसल्याने सर्वांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आमच्यासाठी रुग्णसेवा प्राथमिक आहे. पण दोन दिवसात प्रशासनाला जाग आली नाही तर आम्हाला कोव्हिड सेवादेखील बंद करावी लागेल”, असा इशारा निवासी डॉक्टरांनी दिला.