मुंबई : नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे सचिवपदी बदली करण्यात आली आहे. दरम्यान, ही काही त्यांची पहिली बदली नाही आहे. त्यांच्या चोख कामांमुळे आणि तत्त्वांमुळे ते कायमच चर्चेत राहिले आहेत. यावेळी झालेल्या बदलीनंतर एका मुलाखतीमध्ये तुकाराम मुंढे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.
गेल्या काही वर्षात मी माझा आक्रमकपण कमी केला. माझ्या स्वभावाला मुरड घातली पण यापुढे माझ्या कितीही बदल्या झाल्या तरी मी माझ्या तत्त्वांशी तडजोड करणार नाही असं ठाम मत तुकाराम मुंढे यांनी या मुलाखतीत मांडलं आहे. इतकंच नाही तर, मी माझ्या तत्त्वांना तिलांजली दिली तर ते माझ्याच पाठीत मीच खंजीर खुपसल्यासारखं होईल असं मुंढे म्हणाले.
तुकाराम मुंढे हे सध्या कोरोनाबाधित असून नागपूरमध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या या खुलासांमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. खरंतर, याआधी भाजपचं सरकार असतानाही मुंढे यांची वारंवरा बदली करण्यात येत होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘मी नेमका काय गुन्हा केला होता की माझी बदली करण्यात आली’ असा थेट सवालही सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी उपस्थित केला आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे, ‘नागपुरात माझ्याविरोधात काही मिळेना म्हणून माझ्या चारित्र्य हानीचे प्रकार घडवण्यात आले. महिलांना माझ्याकडे आणून कपडे फाडण्याचे प्रकार घडवले गेले’ असा धक्कादायक खुलासा तुकाराम मुंढे यांनी केला आहे.
दररोज माझ्याविरोधात आरोप केले जात होते. मला ठरवून टार्गेट केलं जात होतं. माझं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. असं सगळं कोण करणार? ही भाजपचीच लोकं होती? दुसरं कोण करणार? असा सवालही यावेळी तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला.