नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर पहिल्यांदाच भाष्य केले आहे. ‘मन की बात’ या रेडिओवरील कार्यक्रमात मोदी बोलत होते. ‘२६ जानेवारीला तिरंग्याचा अपमान झाला, यामुळे देशाला धक्का बसला, खूप दुःख झाले’, असे मोदी यांनी म्हटले. दरम्यान शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली सुरू असताना काहींनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वजाच्या शेजारी आणखी एक झेंडा फडकावला होता.
शेती सुधारणा कायद्या विरोधात शेतकरी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर मार्च दरम्यान लाल किल्ल्यावर घडलेल्या प्रकाराबद्दल पंतप्रधांनी मौन सोडले आहे. रविवारी देशवासियांना ‘मन की बात’ कार्यक्रमातून संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की, महिन्याच्या सुरवातीला क्रिकेटच्या मैदानातून देशवासियांना चांगली बात मिळाली. भारताच्या क्रिकेट संघाने सुरूवातीच्या अडचणींनंतर, शानदार पुनरागमन करत, ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका जिंकली. खेळाडुंची कठोर मेहनत आणि सांघिक वृत्ती ही प्रेरित करणारी आहे. हे सर्व घडत असताना, दिल्लीत, २६ जानेवारीला तिरंग्याचा अपमान झालेला पाहून, देश, अत्यंत व्यथितही झाला आहे.’
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
असामान्य काम करणाऱ्या लोकांचा, त्यांची कामगिरी आणि मानवतेप्रति त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल, देशाने पद्म पुरस्काराने गौरव केला. यंदाही वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या लोकांना देशाला पुढे नेणाऱ्या , प्रत्यक्ष मैदानात काम करणाऱ्या कुठेही प्रसिद्धी न मिळालेल्या अशा अप्रसिद्ध नायकांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्याची जी परंपरा देशाने काही वर्षांपूर्वी सूरू केली होती, ती, या प्रकारे, यावर्षीही कायम राखण्यात आली आहे. पुरस्कार प्राप्त मान्यवरांकडून देशवासीयांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
कोरोना विरोधातील युद्धात भारताने एक जगासमोर आदर्श ठेवला आहे केवळ १५ दिवसात भारताने ३० लाखांहुन अधिक कोरोना कोरोना योध्यांना लसीकरण केले आहे. अमेरिकेसारख्या समृद्ध देशातही, या कामासाठी १८ दिवस लागले होते. तर ब्रिटनला तब्बल ३६ दिवस लागले होते. भारतात बनवण्यात आलेल्या लस आत्मनिर्भरतेचे प्रतिक आहे. देशाच्या आत्मसन्मानाचे प्रतिक आहे. संकटाच्या घडीला, भारत आज जगाची सेवा करू शकत आहे, कारण, भारत, औषधे आणि लसीच्या बाबतीत सक्षम आहे, आत्मनिर्भर आहे. हाच विचार आत्मनिर्भर भारत अभियानाच्या मागेही आहे. भारत जितका अधिक सक्षम होईल, तितकी अधिक, मानवतेची सेवा करेल, तितका जास्त जगाला त्याचा लाभ होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.