नवी दिल्ली : केंद्राने पारित केलेल्या तीन कृषी विषयक बिलाविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली वेशीवर देशभरातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन गेल्या ७९ दिवसांपासून सुरूच आहे. त्यात प्रजासत्ताक दिनी घडलेल्या घटनेमुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते.
आज शिवसेना खासदार संजय राऊत गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचं राऊत यांनी सकाळी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगितलं होतं.
खासदार संजय राऊत यांच्यासोबत अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, प्रतापराव जाधव ,कृपाल तुमाणे हे नेतेही गाझीपूरला पोहोचले आहेत. यादरम्यान खासदार संजय राऊत यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शिवसेना नेत्यांच्या भेटीनंतर राकेश टिकैत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ‘विरोधक आम्हाला पाठिंबा देण्यास येत असल्यास आम्हाला कोणतीही अडचण नाही. पण त्याचं राजकारण होऊ नये,’ असं टिकैत म्हणाले. ‘राजकीय नेते आमच्या भेटीसाठी येत असल्यास त्याला आम्ही काहीही करू शकत नाही. या भागातील वाहतुकीची समस्या पोलिसांनी केलेल्या बॅराकेडिंगमुळे निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांनी वाहतूक रोखून धरलेली नाही,’ असं टिकैत यांनी म्हटलं.
संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “आम्ही राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली आहे. शिवसेनेचे सर्व खासदार या ठिकाणी आले. त्यांना जो संदेश द्यायचा होता तो आम्ही दिला आहे. आम्ही पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांसोबत उभे आहोत. सरकारनं त्यांच्याशी योग्यरित्या चर्चा केली पाहिजे. हा कोणत्याही राज्याचा विषय नाही. हा देशातील शेतकऱ्यांचा विषय आहे. चर्चेत कोणतंही राजकारण येऊ देऊ नये,” असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
शेतकरी आंदोलकांच्या केंद्र सरकारसोबत ११ वेळा चर्चा झाल्या. मात्र, तरीही यावर अद्याप तोडगा निघू शकला नाही. हे कृषी बील रद्द व्हावे, या मागणीवर शेतकरी आडून बसले आहेत. या शेतकऱ्यांना देशभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.