पुणे / मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आपल्या विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेस नेतृत्वांनी त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष पदाचा पुढचा दावेदार कोण असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला होता. मात्र यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि आघाडी सरकारचे मार्गदर्शक शरद पवार यांनी भाष्य केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुण्यात शरद पवारांना या बद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी ते म्हणाले की, “विधानसभा अध्यक्षपद ही काँग्रेसची जागा आहे. विधानसभा अध्यक्षपद, मुख्यमंत्री या जागा पक्षाच्या असल्या तरी सहकाऱ्यांशी विचारविनिमय करण्याची एक पद्धत आहे” असे शरद पवार म्हणाले.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस त्या पदावर दावा सांगणार अशी सुद्धा चर्चा सुरु झाली होती, मात्र या चर्चा चुकीच्या असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यासाठी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
* नवीन विधानसभा अध्यक्ष कोण?
नाना पटोले यांच्या रिक्त जागेवर तीन काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची नावं चर्चेत आहेत. भोर विधानसभा आमदार संग्राम थोपटे यांचे नाव पुढे आले आहे. थोपटे हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे कडवे काँग्रेसचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मंत्री म्हणून सुद्धा काम केले होते. महाविकास आघाडीत मंत्रिपद न मिळाल्यामुळे संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती.
त्यामुळे संग्राम थोपटे यांना संधी देऊन पुणे जिल्ह्यात काँग्रेसला वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यांची जमेची बाजू जरी असली तरी राष्ट्रवादी त्यांच्या नावाला अनुकूल राहील का याविषयी वेगवेगळे तर्क आहेत. तर दुसरे नाव हे सुरेश वारपूडकर यांचे समोर आले आहे. सुरेश वारपूडकर हे पाथरी मतदारसंघामधून निवडून आले आहेत. 1998 मध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. परभणीमधून 1998-99 मध्ये खासदार सुद्धा होते. अत्यंत मितभाषी आणि सर्वांशी चांगले राजकीय संबंध ही वारपूडकर यांची जमेची बाजू आहे.
अमीन पटेल हे मुंबईतील आमदार असून ही त्यांची तिसरी टर्म आहे. मुंबादेवी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे. मुस्लिम चेहरा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायद्याचा असला तरी शिवसेना मात्र त्यास तयार होईल का याबाबत मात्र शंका व्यक्त केली जात आहे.