सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात 17 जणांची स्मारक समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी समितीचे अध्यक्षपद पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपविले असून, कार्याध्यक्षपदी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांची नेमणूक केली. सदस्यांमध्ये मात्र शिवसेनेचे दोन जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख आणि महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख यांच्यासह काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना सदस्य म्हणून घेतले आहे. त्यामुळे ही स्मारक समिती आहे की महाविकास आघाडी समिती? अशी चर्चा सुरू झाली आहे.
आता नव्या समितीत भाजप समर्थक व भाजप नेत्यांना वगळून शिवसेनेच्या चार पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना समितीवर संधी दिली आहे. त्यात ज्येष्ठ माजी आमदार गणपतराव देशमुख, आमदार रोहित पवार, उत्तमराव जानकर, बाळासाहेब बंडगर, अशोक पाटील, चेतन नरोटे, आदित्य फत्तेपूरकर, बाळासाहेब शेळके, गणेश वानकर, पुरुषोत्तम बरडे, गुरुशांत धुत्तरगावकर, अस्मिता गायकवाड, सारिका पिसे, गेना दोलतोडे यांचा समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर विद्यापीठाचे नामांतर भाजप सरकारच्या काळात झाले. त्यासाठी तत्कालीन जलसंधारण मंत्री राम शिंदे, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत विद्यापीठात कार्यक्रम पार पडला. नामांतरणानंतर विद्यापीठात अहिल्यादेवींचे आश्वारूढ स्मारक व्हावे, अशी मागणी पुढे आली. स्मारकासाठी दोन कोटींचा निधी देण्याची घोषणा मंत्री सामंत यांनी काही महिन्यांपूर्वी केली. मात्र, दोन दिवसांपूर्वी सोलापूर विद्यापीठात आल्यानंतर त्यांनी स्मारकासाठी दीड कोटीचा तर अध्यासन केंद्रासाठी एक कोटीचा निधी देण्याची ग्वाही दिली. तत्पूर्वी, स्मारकाच्या दृष्टीने तयारी करणाऱ्या विद्यापीठाने एक समिती नियुक्त केली होती. त्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर, अहिल्यादेवींचे वशंज भूषणसिंहराजे होळकर, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, आमदार रोहित पवार, नगरसेवक चेतन नरोटे, सुनील बंडगर यांच्यासह आणखी काहीजणांचा समावेश होता.
* समितीला राजकीय झालर
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारक प्रेरणादायी व्हावे, त्यांच्या कार्यावर व विचारावर संशोधन व्हावे यादृष्टीने स्मारक व अध्यासन केंद्र उभारले जाणार आहे. वास्तविक पाहता, या समितीत महिला प्रतिनिधी म्हणून कुलगुरूंशिवाय अन्य कोणीच नाही. महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, गोपीचंद पडळकर यांच्यासह माजी मंत्री ढोबळे यांनाही या समितीत घेतलेले नाही. त्यामुळे या समितीला राजकीय झालर असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.