सोलापूर : महानगरपालिकेच्या स्थायी आणि परिवहन समितीच्या सभापतींच्या निवडीत पुन्हा पेच निर्माण झालाय. गटनेते पदाच्या वादातून थेट स्थायी समिती आणि परिवहन समितीच निलंबित केलीय. महापालिका स्थायी व परिवहन समिती सदस्यांच्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या नियुक्त्या नगरविकास खात्याने सोमवारी बेकायदेशीर ठरविल्या. त्यामुळे पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्थायी व परिवहन समिती सभापती निवड आज सोमवारी स्थगित केली.
एमआयएमचा गटनेता कोण या वादातून मागील आठवड्यात निवडणूक प्रक्रियेला शासनाने स्थगिती दिली होती. मात्र कोर्टाच्या आदेशामुळे आज ही प्रक्रिया पार पडणार होती. आज निवडणुक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर शासनाने संपूर्ण स्थायी समिती आणि परिवहन समितीच निलंबित केली. त्यामुळे आज होणारी निवडणूक प्रक्रिया देखील रद्द करावी लागली आहे.
स्थायी व परिवहन सदस्य निवडीवरुन एमआयएम सदस्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. समितीच्या सदस्य पूनम बनसोडे यांनी नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यामुळे नगरविकास खात्याने 5 मार्च रोजी निवडणुकीला स्थगिती दिली होती. याविरुद्ध भाजपच्या अंबिका पाटील उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने तत्काळ निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. परंतु या दरम्यान नगर विकास खात्याने पूनम बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीसंदर्भात विभागीय आयुक्तांकडून अहवाल मागवला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विभागीय आयुक्तांनी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सदस्य निवडी नियमांना धरून झालेल्या नाहीत, असा अहवाल नगरविकास खात्याला पाठवला. त्यानुसार नगर विकास खात्याने सदस्य निवडीचे दोन्ही ठराव विखंडनास पात्र असल्याचा आदेश काढला. याबाबतचे पत्र महापालिका प्रशासनाला पाठवले. हे पत्र तत्काळ पीठासन अधिकाऱ्यांकडे पोहोचले. या पत्राच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक स्थगित केली. भाजपाच्या सदस्यांनी पुन्हा जल्लोषाची तयारी केली होती. परंतु नगर विकास खात्याच्या आदेशामुळे पुन्हा त्यांचा हिरमोड झाला.
दरम्यान महाविकास आघाडी सरकारने सत्तेचा दुरुपयोग करत पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपला विकासापासून रोखण्याचे काम केले आहे. असा आरोप भाजपचे पक्षनेते श्रीनिवास करली यांनी केला. एमआयएमच्या गटनेते पदाचा वाद असताना संपूर्ण समितीच निंलबित करण्यात आली आहे. हा सत्तेचा गैरवापर असून भाजप या विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याची माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.
* 2018 पासून सभापतीविना पालिकेचा कारभार
2018 साली सत्ताधारी भाजपच्या विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या गटात चढाओढ पाहायला मिळाली होती. ऐन अर्ज दाखल करण्याच्या वेळी विजयकुमार देशमुख गटातील एका कार्यकर्त्यांने सुभाष देशमुख गटातील सभापती पदाच्या उमेदवाराचा अर्ज पळवून नेला होता. हा सगळा गोंधळ न्यायलयात पोहोचल्याने जवळपास 3 वर्ष स्थायी समितीच्या सभापतीविनाच पालिकेचा कारभार सुरु होता.