नांदेड : नांदेडच्या देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी विजय मिळवला आहे. त्यांना 1,08,840 मतं मिळाली आहेत. अंतापूरकर यांनी भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना 41,933 एवढ्या मतांनी हरवले आहे. ही निवडणूक सर्व पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी या ठिकाणी लढत झाली. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. उत्तम इंगोले यांना 11,347 मतं मिळाली.
मतमोजणीच्या सहाव्या फेरीअखेर काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी आघाडी घेतली होती. तर, भाजप उमेदवार सुभाष साबणे हे पिछाडीवर होते. मतमोजणीच्या सहाव्या फेरीअखेर अंतापूरकर यांनी 7768 मतांनी आघाडी घेतली होती. नंतर आघाडी अशीच पुढे जावून काँग्रेसचा विजय झाला.
देगलूर पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेचे होती. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्यासाठी प्रचार आणि सभा मेळावे घेतले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष देखील त्यांचे उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारासाठी तळ ठोकून देगलूरमध्ये होते. हा विजय माझा नसून महाविकास आघाडीचा असल्याचे जितेश अंतापूरकर यांनी म्हटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले, काँग्रेसला जनतेनं कौल दिला आहे. एकंदरीत एक पॉझिटिव्ह वातावरण देशात तयार झालं आहे. हाच कल संपूर्ण देशात झालेल्या पोटनिवडणुकीत दिसत आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना चांगले यश मिळाले असल्याचे म्हणाले. आम्ही देगलूर मतदार संघाचा विकास करत राहील. लोकांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर विश्वास ठेवला आहे. या जिल्ह्यात शंकरराव चव्हाण यांच्या पुण्याईमुळे लोकांनी भक्काम साथ दिली असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
या निवडणुकीच्या प्रचारासाठी दिग्गजांनी हजेरी लावून विजयाचा दावा ठोकला होता. भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांच्या अनेक दिग्गजांच्या सभा झाल्या तर महाविकास आघाडीकडून मंत्री अशोक चव्हाण, छगन भुजबळ, नाना पटोले यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. वंचितकडून प्रकाश आंबेडकरांनी देखील सभा घेतल्या आहेत.
दरम्यान, वर्ष 2019 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर 89 हजार 400 मताधिक्य मिळून विजयी झाले होते. त्याचप्रमाणे त्यावेळचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार सुभाष साबणे यांना 66 हजार 560 तर वंचित बहुजन आघाडीचे तत्कालीन उमेदवार रामचंद्र भरांडे यांना 13 हजार 300 इतकी मते मिळाली होती.