नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सशस्त्र पोलिसांच्या 9 व्या बटालियनवर अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. अतिरेक्यांनी केलेल्या या बेछूट गोळीबारात 3 पोलिस शहीद झाले असून 11 पोलिस जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
दरम्यान, सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली आहे. तीन जवानांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. हा दहशतवादी हल्ला जम्मू- काश्मीरमधील झेवान भागात झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीर टायगर्स या संघटनेनं ही जबाबदारी घेतली असून पहिल्यांदाच हे नाव समोर आलं आहे. हा ग्रुप लष्कर-ए-तय्यबाशी निगडीत असावा, अशीही माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये किती अतिरेकी होते आणि कसा हल्ला करण्यात आला, याबाबत तपास सुरु आहे. सध्या सर्व जखमींना दवाखान्यात नेण्यात आलं आहे. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.
दुसरीकडे, आज काश्मिरमधील रंगरेठमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. या परिसरात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर, सुरक्षा दले आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने परिसराला वेढा घातला. शोधमोहीम सुरू केली.
यावेळी दहशतवादी व सुरक्षा दलांत चकमक झाली. या ठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी दलावर बेछूट गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन अज्ञात दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. यापूर्वी, रविवारी दक्षिण काश्मिरातील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी जैशे मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* दुचाकीचा अपघात, जवानाचा मृत्यू
जळगाव – जवानाच्या दुचाकीला एका वाहनाने कट मारल्यामुळे अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात जवान गंभीर जखमी झाला होता. त्यानंंतर उपचारादरम्यान आज या जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
घटना जळगाव जिल्ह्यातील वाघरे तालुका पारोळा येथे घडली आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन व चार वर्षाचे दोन मुले आहेत. तसेच एक अविवाहित भाऊ असून ते देखील आर्मीमध्ये नोकरीला आहे.
नंदू संजय पाटील (वय 30) असे अपघात मृत्यू झालेल्या जवानाचे नाव असून ते टेहू, तालुका पारोळा येथील रहिवासी होते. पाटील हे गेल्या दहा वर्षापासून सैन्य दलात असून ते सुट्टीवर आपल्या गावी आले होते.
8 डिसेबर रोजी पाटील हे सुट्टीवर गावी आले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 डिसेंबर रोजी ते वाघरे तालुका पारोळा येथे एका नातेवाईकांकडे कार्यक्रमानिमित्त दुचाकीने जात होते. टेहु ते वाघरे दरम्यान रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या दुचाकिला एका वाहनाने कट मारला त्यामुळे पाटील यांचा तोल गेला व ते खाली पडले.
दुचाकीसह खाली पडल्यामुळे पाटील गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना धुळ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.