● फडणवीसांचा हा बी प्लॅन : चंद्रकांत खैरे
औरंगाबाद : लवकरच महापालिका निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हातमिळवणी करण्याची ऑफर असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एमआयएमने महाविकास आघाडीला दिली आहे. पण शिवसेनेने ही ऑफर धुडकावली आहे. औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणाऱ्यांसोबत कोणत्याही प्रकारची युती शक्य नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट घेतली. त्यानंतर या प्रतिक्रिया उमटल्या.
महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी असल्याचं समोर आलं आहे. शरद पवारांपर्यंत निरोप पोहोचवा, अशी विनंती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना केली आहे. एमआयएमच्या या ऑफरनंतर आता शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एमआयएमकडून आघाडीची ऑफर देण्यात आली आहे. भाजपला हरवायचं असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवं, असं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत खासदार इम्तियाज जलील यांनी वक्तव्य केलं आहे.
जलील म्हणाले की, आमच्यावर आरोप करण्यात येतो की भाजप आमच्यामुळे जिंकते. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटायला आले असता त्यांना ऑफर दिली आहे. एकदा हे संपवायचं असेल, तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का? त्यावर ते काही बोलले नाहीत. आता बघायचं आहे की त्यांना फक्त आरोप करायचे आहेत की त्यांना त्यांची भूमिका सिद्ध करायची आहे.
यावर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत स्पष्टच म्हणाले की, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या विचारांचे आहेत. औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकतात, ज्यांचा आदर्श औरंगजेब आहे. त्यांच्यासोबत युती शक्य नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. एमआयएमसोबत उघड अथवा छुपी युती होणार नाही. ज्यांच्यासोबत त्यांची छुपी युती आहे, ती युती त्यांना लखलाभ ठरो असेही राऊत यांनी म्हटले. राज्यात तीन पक्षांचे सरकार असून त्यात चौथा पक्ष येणार नाही, असेही त्यांनी म्हटले. Shiv Sena rejects MIM’s offer in Aurangabad
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचे राऊत यांनी सांगितले. एमआयएमची भाजपसोबत छुपी युती आहे. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये हे दिसून आलं असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
यावेळेस भाजप नेते रावसाहेब दानवे यांचाही शाब्दिक समाचार घेतला. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, मी रावसाहेब दानवे यांना जितके ओळखतो तितके ते भांग पीत नाहीत किंवा दुसरी कुठली नशा करत नाहीत. त्यामुळे त्यांना 125 आमदार असं म्हणायचं असेल पण ते चुकून फक्त 25 म्हणाले. ही स्लीप ऑफ टंग असेल. पण कालची उतरली असेल तर आम्ही त्यांना असं सांगतो की भाजपचे 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिवसेना ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमची ऑफर येण्यामागे फडणवीसांचा डाव असल्याचा दावा केला आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. परंतु सरकार पडत नसल्यामुळे त्यांनी 2024 च्या निवडणुकीत बहुमताने येणार असल्याचे सांगितले आहे.
मात्र तोपर्यंत काय करायचे म्हणून फडणवीसांनी असा प्रकार सुरु केला आहे. एमआयएमसोबत त्यांची छुपी युती आहे. असे वक्तव्य केल्याने शिवसेना आक्रमक होईल आणि महाविकास आघाडी सरकार अस्थिर होईल असा डाव फडणवीसांनी आखला आहे. फडणवीसांच्या डोक्यातील ही कल्पना असून त्यांचा हा बी प्लॅन आहे असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा एमआयएमला महाविकास आघाडी सरकारमध्ये घुसवून सरकार तोडण्याचा डाव असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीसांचा हा बी प्लॅन असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एकत्र येण्याची ऑफर दिली आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी ऑफर फेटाळली आहे. सत्तेसाठी शिवसेना काय भूमिका घेणार हे आम्हाला यचे असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांचा महाविकास आघाडीविरोधात हा बी प्लॅन आहे. एमआयएम आम्हाला ऑफर देऊ शकत नाही आणि शिवसेना त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे जे औरंगजेबासमोर गुडघे टेकतात त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही. ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना सोनेरी महालात चार महिने डांबून ठेवले. ते आम्ही कसं सहन करणार? शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी औरंगाबादगचं नाव संभाजीनगर केलं आहे. ही त्यांची छुपी ऑफर असून आमचे जुने मित्र हुशार असून ही त्यांचीच कल्पना असल्याचे चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.
महाविकास आघाडी सरकारसोबत एकत्र येण्याविषयी वक्तव्य करण्याचा इम्तियाज जलील यांना काय अधिकार आहे. जलील यांचे शहरात काय काम आहे. जिल्ह्यातील मुस्लिम बांधव आणि नागरिक जलील यांना कंटाळले आहेत. काम करत नाही म्हणून महाविकास आघाडीमध्ये जाऊ असे त्यांना वाटत आहे. त्यांना संधी नाही आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची राहिल. हे सरकार चांगले काम करत राहील असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे.