अमरावती, 12 जून, (हिं.स.) आज देशातील एकूण ८१ कोटी गरीबांपैकी एकही व्यक्ती उपाशी पोटी राहू नये, याची पूर्णपणे दखल केंद्रातील नरेंद्र मोदी यांचं सरकार घेतय. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळात देशातील २५ कोटी कुटुंबं दारिद्र्य रेषेबाहेर निघाली असून हे फार मोठं यश आहे, असा दावा भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज अमरावतीत पत्रकारांशी संवाद साधताना केला.
काँग्रेसनं गरिबांवर केला अन्याय :
२०१४ पूर्वी देशात काँग्रेसच्या नेतृत्वात असणाऱ्या यूपीए सरकारनं सर्वात जास्त अन्याय गरिबांवर केला. रोटी, कपडा, मकान या सर्व गोष्टी केवळ त्यांच्या जाहीरनाम्यात होत्या. प्रत्यक्षात मात्र गरिबांवर त्यांनी सर्वाधिक अन्याय केलाय असा आरोप देखील रवींद्र चव्हाण यांनी केला. आज पंतप्रधान आवास योजनेतून प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं हक्काचं घर मिळावं यासाठी भरीव योगदान केंद्र आणि राज्य सरकार देत आहे, असं देखील चव्हाण म्हणाले.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी :
केंद्रातील नरेंद्र मोदी यांचं सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असणारं आहे. बच्चू कडू यांचं नाव न घेता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जे काही आंदोलन सुरू आहे तेच धोरण सरकारचं आहे. आंदोलनकांची दखल सरकारचे प्रतिनिधी म्हणून प्रशासकीय अधिकारी सातत्यानं घेत आहेत, असं देखील रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं.