सोलापूर, 26 मे (हिं.स.)।
उजनी धरण झाल्यापासून मागील ४५ वर्षांत पहिल्यांदाच मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे धरणात चार दिवसांत सहा टीएमसी (१२ टक्के) पाणी वाढले आहे. गतवर्षी जूनअखेर उणे पातळीत राहिलेले धरण आता मेअखेर प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे.
सोलापूर, पुणे, नगर, धाराशिव अशा शहरांबरोबरच पुणे व सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसींना आणि सोलापूर जिल्ह्यातील १५० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींना उजनी धरणातील पाण्याचा मोठा आधार आहे. याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर जमिनीला सध्या उजनीतून थेट पाणी मिळते.
शेतीसाठी सोडलेल्या दोन आवर्तनामुळे धरणाची पातळी सध्या उणे २३ टक्क्यांपर्यंत पोचली होती. पण, मॉन्सूनपूर्व पावसामुळे उजनी धरणाची पातळी उणे १२ टक्क्यांवर आली आहे. पाऊस असाच आणखी चार-पाच दिवस राहिल्यास धरण मेअखेर प्लसमध्ये (उपयुक्त साठ्यात) येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
—————