सोलापूर, 30 जून (हिं.स.) : आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने एकूण 7 विशेष गाड्या सोडलेल्या आहेत. यामध्ये १ ते १० जुलैपर्यंत पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर अशा ३ एकेरी आषाढी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. तसेच उधना-मिरज विशेष गाडीच्या ४ फेऱ्या होणार आहेत. मिरजेपर्यंत या एकेरी विशेष गाड्यांसह सात फेऱ्या होणार असून मध्य रेल्वे सध्या ८३ आषाढी विशेष गाड्या चालवत आहे. ६ जुलै रोजी आषाढीचा मुख्य सोहळा होणार आहे.
मात्र, पंढरपूरकडे येणाऱ्या व परत जाणाऱ्या भाविकांची वर्दळ आषाढी एकादशी पूर्वी व नंतरही असते. यामुळे मध्य रेल्वेने १ ते १० जुलै दरम्यान विशेष गाड्या सोडल्या आहेत. गाडी क्रमांक ०१४०९ अनारक्षित एकेरी विशेष गाडी ६ जुलै रोजी मिरज येथून सकाळी ९.३० वा. सुटेल आणि लातूर येथे त्याच दिवशी ७.२० वाजता पोचणार आहे. या गाडीला अरग, कवठेमहांकाळ, धालगाव, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, कुर्डुवाडी, शेंद्री, बार्शी टाऊन, पांगरी, धाराशिव, येडशी, कळंब रोड, ढोकी, मुरुड, औसा रोड, हरंगुळ हे थांबे आहेत.