सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बंधाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नादुरूस्त बंधाऱ्यांना दुरूस्त करण्यासाठी राज्य शासनाकडून 13.10 कोटींचा निधी दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीमध्ये झालेल्या चर्चेनुसार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बंधारे दुरूस्तीबाबत बैठक घेण्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले होते.
त्यानुसार आज पुणे येथील विधानभवन येथे पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्ह्यातील नादुरूस्त बंधाऱ्याबाबत बैठक झाली. यावेळी पालकमंत्री भरणे, आमदार शहाजीबापू पाटील, प्रशांत परिचारक, माजी आमदार दिपक साळुंखे-पाटील, जलसंपदाचे कार्यकारी संचालक टी.एन. मुंडे, सोलापूरचे अधीक्षक अभियंता धीरज साळे उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बंधारे दुरूस्तीसाठी 13.10 कोटींचा प्रस्ताव पालकमंत्री भरणे यांनी सादर केला. उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रस्तावाला तत्वता मान्यता दिली आहे. याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी देऊन नादुरूस्त बंधारे दुरूस्त करण्याचे आदेश दिले.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नादुरूस्त बंधारे पावसाळ्यापूर्वी दुरूस्त न झाल्यास सर्व पाणी वाहून जाईल. शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाणी राहणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनाला आणून दिले.
* निधी दिल्याचा झाला होता समज
बंधारे दुरुस्तीसाठी सोलापूर जिल्ह्याला निधी दिला असल्याचा समज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा झाला होता. पण, निधी मिळाला नसल्याचा मुद्दा आमदार परिचारक यांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिला. त्यासाठी त्यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे राज्याचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करून खातरजमाही केली. सोलापूर जिल्ह्यातील बंधाऱ्यांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना तुम्ही मला याबाबतची कल्पना का दिली नाही?’ अशा शब्दांत सोलापूर जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची कानउघडणी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.