□ ‘रामदासांनी छत्रपतींबद्दल जे लिहिलंय तेवढं चांगलं आजतागायत मी वाचलं नाही’
पुणे / मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आज पुण्यात साजरा झाला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राज ठाकरे काय बोलणार आणि काय घोषणा करणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र यावेळी आपण काही राजकीय बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गुढीपाडव्याला शिवतीर्थावर आपल्याला जे काही बोलायचे आहे, ते बोलणार, असेही राज ठाकरे म्हणाले.
मनसे आज आपला 16 वा वर्धापनदिन साजरा करत आहे. त्यावेळी ते बोलत होते. मनसे पहिल्यांदाच मुंबईबाहेर म्हणजे पुण्यामध्ये वर्धापनदिन साजरा केला. यावेळी कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारींवर निशाणा साधला.
‘तुम्हाला शिवाजी महाराज, महात्मा फुले माहितीयेत का ? ना छत्रपतींनी ना रामदास स्वामींनी सांगितलं की ते गुरुशिष्य होते. एकाची विद्वत्ता तर एकाचं शौर्य कमी करायचं. रामदासांनी छत्रपतींबद्दल जे लिहिलंय तेवढं चांगलं आजतागायत मी वाचलं नाही,’ असं राज म्हणाले.
हे महाराष्ट्राचे राज्यपाल, यांना काही समज आहे का? असा सवाल करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे.शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबद्दल काही अभ्यास नसताना त्यावर भाष्य काय करायचं आणि समाजात भांडणं लावायची हे त्यांचे उद्योग असं ते म्हणाले.
MNS anniversary celebrations: Governor criticizes Koshyari, but Raut is ridiculed
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
राज ठाकरे म्हणाले की, “रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांच्या बद्दल कधीच सांगितलं नाही की ते त्यांचे शिष्य होते, आणि शिवाजी महाराजांनीही कुठेही नमूद केलं नाही की रामदास स्वामी त्यांचे गुरू होते. मग काहीही बोलून नुसता भांडणं लावण्याचा उद्योग यांनी कशाला करायचा? आमच्या महापुरुषांना बदनाम करायचं आणि त्यांच्या नावावर मतं मागायची असा उद्योग सुरू आहे.” महात्मा फुले यांच्याबद्दलही राज्यपालांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरही राज ठाकरेंनी टीका केली आहे.
संजय राऊत किती बोलतात, काय बोलतात, सगळ्याची एक ॲक्शन असते. चॅनेल लागलं तर हे सुरू, चॅनेल हटलं तर हे बंद. मग नंतर यांचं पुन्हा कसं काय सुरू, काय चाललंय’ अशी संजय राऊतांची खिल्ली मनसे प्रमुख राज ठाकरे उडवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत भाजपवर टीका करण्यासाठी पत्रकार परिषदा घेत आहेत. त्यावर आज राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “चॅनेल लागलं तर हे सुरू, चॅनेल हटलं तर हे बंद. मग नंतर यांचं पुन्हा कसं काय सुरू, काय चाललंय. भविष्यातील महाराष्ट्रातील पिढ्या या पाहतायत, ते काय शिकतील? यांना फक्त निवडणुकीचं पडलं आहे.”
सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपवायला निघाले आहेत, विरोधी पक्ष म्हणतात आम्हाला संपवायला निघालेत. टीव्हीवर शिव्या सुरू आहेत, हेच राजकारण वरती असेल तर ग्रामपंचायतीमध्ये काय सुरू असेल. महाराष्ट्रातील लोक यांना वैतागले आहेत. त्यामुळे त्यांना काही अडचणी आल्या तर ते सरकारकडे न जाता आपल्याकडे येतात हे आपलं यश आहे. या 16 वर्षात लोक आपल्याकडे विश्वासाने येतात, ही 16 वर्षे आपली कमाई आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी जे काम केलं त्यासाठी माझ्याकडे शब्द नसल्याचे म्हणत कौतुक केले.
दरम्यान, संजय राऊतांनीही प्रत्युत्तर दिले आहे. आमचं राजकारण हे नकलावर उभं नाही, आम्ही बोलत राहू असा टोला खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावला आहे. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, परखड मत व्यक्त करत राहू असं संजय राऊत म्हणाले. आमचं राजकारण हे नकलांवर आधारित नाही. आम्हाला ईडीने बोलावलं म्हणून आम्ही बोलत राहिलो, आणि यापुढेही बोलतच राहू. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, जे खरं असेल ते परखडपणे बोलणार. कर नाही त्याला डर कशाला?