अहमदनगर : भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत असताना भाजप नेते सुजय विखे पाटलांनी एक विधान केले आहे. “मी खासदार म्हणून निवडून येण्यात इथल्या शिवसेनेचा 50 टक्के वाटा आहे. म्हणूनच मी गेल्या 3 वर्षात उद्धव ठाकरेंच्या विरोधातही बोललो नाही. जेव्हा शिवसेनेवर संकट येईल, तेव्हा मी या नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना एकटं सोडणार नाही. त्यामुळे फडणवीस आणि मोदींनी माझ्यावर कारवाई केली तरी चालेल,” असे विखे म्हणाले. I will not leave Shiv Sena; NCP raised eyebrows over BJP MP Vikhen’s statement
भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षातील मतभेद वाढले आहेत. दोन्ही पक्षातील नेते सातत्याने एकमेकांवर टीका करताना दिसतात. पण, अहमदनगरमध्ये एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. नगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिवसेनेला साथ देणार असल्याचे वक्तव्य केले आहे. पारनेर तालुक्यातील एका पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुजय विखे बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “मी खासदार म्हणून निवडून येण्यात 50 टक्के वाटा येथील शिवसेनेचा आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांच्या काळात मी कधीही शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही. माझे आजही हेच मत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या निकालावरुन ते पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी वेळीच सावध व्हावे” असंही विखे म्हणाले.
”राज्यात परिस्थिती काहीही असो, पण नगर जिल्ह्यात णी शिवसेनेसोबत राहणार. केवळ पारनेर तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातच भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेशी एकनिष्ठ राहील. जेव्हा केव्हा शिवसेनेवर संकट येईल, तेव्हा मी या नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना एकटे सोडणार नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर कारवाई केली तरी चालेल,” असे सुजय विखे म्हणाले.
थेट बोलण्याची हिंमत ठेवणारा मी भाजपचा एकमेव खासदार आहे. मी येथील राजकारण ओळखतो. येथे विचारांचा वारसा आहे. तो वारसा टिकविण्यासाठी असे निर्णय घेणे आवश्यक आहे. यावर शिवसेनेची काय भूमिका असेल, हे मला सांगता येणार नाही. मात्र, शिवसेनेने येथे घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला माझा पाठिंबा असेल. येणाऱ्या काळात कोणाची कशी आघाडी होणार हे माहिती नाही. मात्र, मी मात्र शिवसेनेसोबत राहण्यास ठाम आहे. यापुढे माझ्या तोंडून कधीही शिवसेनेवर टीका होणार नाही, याची ग्वाही देतो “, असेही ते म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ उद्धव ठाकरेंचा काँग्रेस, राष्ट्रवादीला मोठा झटका
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसला इशारा दिल्याची चर्चा आहे. येत्या विधान परिषद निवडणुकीत आमच्या मतांच्या भरोशावर राहू नका, असा संदेश शिवसेनेने दिल्याची माहिती आहे. यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत आपल्याला मदत मिळाली नसल्याची भावना शिवसेनेत आहे.
□ भाजपविरोधी पक्षांच्या बैठकीला सीएम राहणार गैरहजर
ममता बॅनर्जी यांनी या बैठकीचे आमंत्रण भाजपविरोधी पक्षांना दिले आहे. मात्र, या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार नसल्याची माहिती आहे. या बैठकीत शिवसेनेकडून कोण सहभागी होणार, याबाबतही काहीच स्पष्ट झाले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काही पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते या बैठकीत सहभागी होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ममता बॅनर्जी यांनी बोलावलेली बैठक ही एकतर्फी असल्याची चर्चा सुरू आहे. बैठकीचा दिवस ठरवण्याआधी ममता यांनी चर्चा न करता पत्र पाठवले असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बैठकीस जाणार नाहीत. तर, दुसरीकडे 15 जून रोजी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर असणार आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह इतर नेतेही या दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि संजय राऊतदेखील या बैठकीसाठी उपस्थित राहणार नाहीत.
□ महाराष्ट्रात काँग्रेस करणार उद्या सोमवारी शक्तीप्रदर्शन
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आलेल्या ईडीच्या समन्स विरोधात काँग्रेसने आंदोलन करायचं ठरवलं आहे. सोमवारी 13 जून रोजी सकाळी 11 वाजता ईडीच्या मुंबईतील बेलॉर्ड इस्टेट आणि नागपुरातील सिव्हिल लाइन्स येथील कार्यालयात तीव्र धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी आणि अमर राजूरकर यांच्यावर आंदोलनाच्या समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.