खास प्रतिनिधी
सोलापूर : मोहोळचे स्पष्टवादी आमदार राजू खरे यांनी सांगोल्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्यावर रविवारी दक्षिण काशी पंढरपुरात टिकेची झोड उठवत त्यांना चांगलेच ‘वर्मी इंजेक्शन’ दिल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार असलेल्या खरेंनी स्व:पक्षीय आमदार डॉ.देशमुखांना लक्ष करत त्यांच्यावर गंभीर आरोपाच्या फैरी झाडल्या. सत्तेच्या जवळ गेलेले आमदार डॉ. देशमुख हे बहुजन आणि धनगर समाजाचे नेते राहिलेले नाहीत, ते आता ब्राह्मण समाजाचे नेते झाले आहेत, असा घणाघाणात आमदार खरे यांनी केला.
विशेष म्हणजे आमदार खरे यांच्या या बेधडक वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरु झाली असून सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांमधील धूसफूस यातून चव्हाट्यावर आल्याचे मानले जात आहे. थेट तोंडावर बोलून मोकळे होणारे नेतृत्व म्हणून आमदार खरेंच्या व्यक्तीमत्वाची ओळख आहे. त्याचा साक्षात्कार आज पंढरपुरच्या एका कार्यक्रमात आला. त्याचे झाले असे की, पंढरपुरात मराठा महासंघाचे संस्थापक स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास खरे यांना संयोजकांनी लोकप्रतिनिधी म्हणून आवर्जून पाचारण केले होते. या कार्यक्रमात बोलताना खरेंनी देशमुखांना निशाणा साधला. सत्तेच्या जवळ गेलेले डॉ. बाबासाहेब देशमुख हे बहुजन आणि धनगर समाजाचे नेते राहिलेले नाहीत, ते आता ब्राह्मण समाजाचे नेते झाले आहेत, असा घणाघाणात आमदार खरे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
सत्ताधार्यांकडे झुकल्याचा टोला
सोलापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडीचे आणि आघाडीने पाठिंबा दिलेले सहा आमदार निवडून आले आहेत. यामध्ये माळशिरसमधून उत्तम जानकर, करमाळ्यात नारायण पाटील, माढ्यातून अभिजित पाटील, मोहोळमधून राजू खरे हे राष्ट्रवादीचे, तर बार्शीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप सोपल आणि सांगोल्यातून शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख हे निवडून आले आहेत. मात्र, यातील डॉ. देशमुख हे सत्ताधारी भाजपकडे झुकल्याचा अप्रत्यक्ष टोला आमदार राजू खरे यांनी देशमुखांना लगावला आहे.
‘हम है मराठा समाज के साथ साथ’चा नारा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी बलिदान दिले. त्यांची बलिदानाची आठवण आजही कायम आहे. मी यापूर्वीही मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी भूमिका मांडलेली आहे. तीच भूमिका आजही कायम आहे. पण, महायुतीचे सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही. मराठा समाजाला आरक्षणासाठी संघटितपणे सरकारच्या विरोधात लढावे लागेल. मराठा समाजाच्या सोबत आम्ही कायम राहणार आहोत, असेही राजू खरे यांनी स्पष्ट केले.
विरोधी आमदारांचा दाबला जातोय आवाज
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आहे, या सरकारकडे पाशवी बहुमत आहे. तब्बल 234 आमदारांंचं पाठबळ असल्यामुळे हे सरकार आम्हाला म्हणजेच विरोधकांना सभागृहात बोलूही देत नाही. आमचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न सत्ताधारी लोकांकडून होत आहे. समाधान आवताडे हे सत्ताधारी भाजपचे आमदार आहेत. त्यांची अडचण मोठी अडचण होते आहे, आमची होत नाही, असेही आमदार खरे म्हणाले.
देशमुखांबद्दल ‘हे’ स्पष्टच सांगून टाकले
आमदार नारायण पाटील, उत्तम जानकर, अभिजीत पाटील, आम्ही सरकारच्या विरोधात लढत आहोत. मात्र, सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे मात्र आमच्यापासून फटकून राहतात. सत्तेच्या जवळ गेल्यामुळे डॉ. बाबासाहेब आमच्यापासून फटकून राहतात, असेही त्यांनी स्पष्ट सांगून टाकले