एकनाथभाई अन् देवाभाऊंमधील नाराजीची दरी होतेय कमी
-कुणाल कामराच्या घमासानात फडणवीस हे शिंदेंच्या बाजूने
ठाम
– खालच्या दर्जाच्या कॉमेडीप्रकरणी माफी मागायलाच हवी
भूमिकेवर मुख्यमंत्री आग्रही
विशेष प्रतिनिधी
मुंबई :
मुख्यमंत्री पदासह मंत्रिमंडळातील महत्वाच्या खात्यावरुन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नाराजी निर्माण झाली होती. परंतु अधिवेशनादरम्यान या दोघांमधील नाराजी कमी होत असल्याचे जाणवत आहे. विशेषत्वे, याची प्रचिती सोमवार (ता.24) कुणाला कामराच्या गाण्याच्या प्रकरणावरुन राजधानी मुंबईसह राज्यभरात जे घमासान सुरु झालं आहे, या अत्यंत महत्वाच्या टप्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेत शिंदे यांच्यावर कविता करुन खळबळ माजवून देणार्या कुणाल कामराने याप्रकरणी माफी मागितलीच पाहिजे, असे ठणकावून सांगितले.
उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री निवड आणि मंत्रिमंडळ विस्तार या टप्यावर फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये केवळ मतभेदच नव्हे, तर मनभेदसुद्धा निर्माण झाल्याचं अनेक आघाड्यांवर तसेच कित्येक प्रसंगातून दिसून आलेले होतं. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान फडणवीस आणि शिंदे या उभतांमध्ये एकमेकांबद्दल पुन्हा बॉडिंग होत असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.
2024 ला विधानसभेला महाराष्ट्रामध्ये सत्ता आल्यानंतर भाजपवाले पुन्हा आपल्याला मुख्यमंत्री करतील अशी आशा एकनाथ शिंदेंना होती.परंतु, संख्याबळामुळे भाजपचे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. सुरुवातीला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास तयार नव्हते. या टप्यावर एकनाथ शिंदे बराच काळ नाराज होते. राज्याच्या बर्याच बैठकांना एकनाथ शिंदे यांनी दांडी मारून कधी आजारी असल्याचे सांगून तर कधी फोन बंद करून गावाकडे गेल्याच्या बातम्या समोर आल्या. एका भाषणात एकनाथ शिंदेंनी मला हलक्यात घेऊ नका अशी धमकीही देऊन टाकली. त्यामुळे बराच काळ शिंदे आणि फडणवीस मध्ये दुरावा दिसून आला.
मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी औरंगजेबाची उपमा दिली त्यावेळी लगेच एकनाथ शिंदे फडणवीस यांच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी विरोधकांवर कडाडून ‘प्रहार’ केला. तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर कामराने व्यंग गाणे केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठीमागे न राहता कामरायाने लगेचच एकनाथ शिंदे यांची माफी मागावी अशी मागणी केली. एकमेकांच्या मदतीला धावून आल्याने फडणीस आणि शिंदे यांच्यातील दरी कमी होऊ लागल्याचे अधिवेशनादरम्यान जाणवत आहे.
शिंदे अन् फडणवीसांच्या ‘दिलसे’ मनोमिलनातून
‘हे’ उमटतील प्रभावी सकारात्मक परिणाम
: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दुरावा आल्याने कार्यकर्त्यांची कामे थांबली होती. पण आता दोघं एकत्र येत असल्याने कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
: 2024 विधानसभा निवडणूक लागण्याअगोदर एकनाथ शिंदे सरकारने बर्याच भाजपाने शिवसेना कार्यकर्त्यांना महामंडळे दिली होती. तीही आता देण्यात येतील, अशी चर्चा आहे.
शिंदेंच्या बाजूने उभे राहणारे
मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच म्हणाले, माफीच मागायला हवी!
स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कुणालाही नाहीये. महाराष्ट्राच्या जनतेने 2024 साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार, हे दाखवून दिलं आहे. हिंदु हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसदार कोण आहे, हे जनतेने ठरवलेले आहे. त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करणं चूक आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेला आदर आहे, त्यांचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. तुम्ही कॉमेडी करा, व्यंग करा पण जर अपमानीत करण्याचं काम कुणी करेल, हे सहन करणार नाही. कामरा यांनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी जर संविधान वाचलं असेल किंवा त्यांना संविधानाची माहिती असेल तर संविधानानेच सांगितलं आहे की, स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसर्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करता येणार नाही. त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे. असं फडणवीस यांनी सांगितलं.