सोलापूर : 2024-25 या आर्थिक वर्षात फेब्रुवारी अखेरपर्यंत सोलापूर एनटीपीसी वीज केंद्राने 6209 मिलियन युनिट्स वीजनिर्मिती केली असून, आर्थिक वर्षाच्या शेवटी 6800 मिलियन युनिट उत्पादन अपेक्षित आहे. 2023-24 मध्ये 7100 मिलियन युनिट वीजनिर्मिती झाली होती. जी आतापर्यंतची सर्वाधिक होती, अशी माहिती कार्यकारी संचालक तपन कुमार बंदोपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत दिली. एनटीपीसी सोलापूर येथे कार्यकारी संचालक तपन कुमार बंदोपाध्याय यांनी
पत्रकारांशी संवाद साधताना 2024-25 या वर्षातील सोलापूर वीज केंद्राच्या यशाबद्दल माहिती दिली. सोलापूर सुपर धर्मल पॉवर स्टेशन संपूर्ण भारतातील सात राज्याच्या वीज गरजा पूर्ण करत असून, महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक वीज पुरवठा केला जातो. है केंद्र 2×660 मेगावॅट (1320 मेगावॅट) क्षमतेसह कार्यरत आहे उष्णताजन्य वीजनिर्मितीबरोबरच, एनटीपीसी सोलापूर आपल्या अक्षय ऊर्जा उत्पादनात वाढ करत असून, 23 मेगावॅट क्षमतेच्या ग्राउंड माउंटेड सौर प्रकल्पाची उभारणी करीत आहे. पर्यावरणीय जबाबदारीच्या दिशेने पाऊल टाकत, एनटीपीसी सोलापूर फ्ल्यू गॅस डीसल्फरायझेशन (FGD) तंत्रज्ञानाचा अवलंब करून वायू प्रदूषण कमी करण्यावर भर देत आहे. तसेच, राख पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. जैव इंधनाचा उपयोग करून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पालाही प्रोत्साहन दिले जात आहे.
एनटीपीसी सोलापूर सामाजिक विकास, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही सक्रिय असून, स्थानिक समुदायासाठी विविध उपक्रम राबवत आहे. रोजगाराभिमुख प्रशिक्षण, महिलांसाठी कौशल्यविकास कार्यक्रम, तसेच स्वयंसहाय्यता गटांसाठी वस्त्रनिर्मिती केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.
गर्ल एम्पॉवरमेंट मिशन (GEM) कार्यक्रमांतर्गत दरवर्षी 40 मुलीना शिक्षण, स्वसंरक्षण आणि सांस्कृतिक प्रशिक्षण दिले जाते. तसेच, गुणवंत विद्यार्थ्यांना केएलई शाळांमध्ये मोफत शिक्षण दिले जाते. हा उपक्रम 2019 पासून सतत राबवला जात असून, भविष्यातही सुरू राहणार आहे.
सोलापूर महानगरपालिकेसोबत भागीदारी करून, उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा योजनेसाठी एनटीपीसी सोलापूरने 240 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
या पत्रकार परिषदेस महाव्यवस्थापक, ओ अॅड एम बिपुल कुमार मुखोपाध्याय, महाव्यवस्थापक, देखभाल नवीन कुमार अरोरा
, एच ओ एचआर मनोरंजन सारंगी आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
परिसरात 55 हजार
वृक्ष लागवड
आतापर्यंत एनटीपीसी प्रकल्पाच्या वतीने परिसरात 55 हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे पर्यावरण संवर्धनाची काळजी घेतली जात आहे. तसेच यापुढेही 800 वृक्षारोपण करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणामुळे या परिसरात पावसाचे प्रमाण वाढले आहे पाणी पातळीही वाढली असल्याचे यावेळी कार्यकारी संचालक तपन कुमार बंदोपाध्याय यांनी सांगितले.
शून्य द्रव उत्सर्जन प्रणाली
यशस्वीपणे राबविली
एनटीपीसी सोलापूरने शून्य द्रव उत्सर्जन प्रणाली आणि पावसाचे पाणी संकलन प्रणाली राबवून पर्यावरणावर होणारा प्रभाव कमी करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे, असे सांगताना संचालक तपन कुमार बंदोपाध्याय यांनी लोकप्रतिनिधी, केंद्र व राज्य सरकारचे अधिकारी, जिल्हा प्रशासन, रेल्वे व कोळसा कंपन्याचे अधिकारी आणि स्थानिक नागरिकांचे आभार मानले.