सोलापूर, 2 एप्रिल (हिं.स.) उन्हाचा पारा चढल्याने पाणी पातळी घटली आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील गारवाड, बचेरी, सुळेवाडी, मगरवाडी या चार गावांतील दहा हजार लोकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने वर्तविली आहे.
माळशिरस तालुक्यातील चार गावे, 39 वाड्या, वस्त्यांवरील नऊ हजार 891 लोकसंख्या आणि नऊ हजार 635 पशुधनास टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या परिसरातील पाणी पातळी घटल्याने विहीर, बोर कोरडे पडले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत या गावांच्या आजूबाजूच्या गावांनाही टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पूर्वतयारी करण्यात येत आहे.