मुंबई, 24 एप्रिल (हिं.स.)।जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांना बुधवारी (दि.23) रात्री डोंबिवलीत हजारो शोकाकुल नागरिकांनी भगशाला मैदानात एकत्रित येत अश्रूंच्या साक्षीने अखेरचा निरोप दिला.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून मृत पावलेल्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. या तिघांना बुधवारी(दि.२३) डोंबिवलीत भगशाला मैदानात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत पावलेल्या तिघांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार जगन्नाथ पाटील,आमदार सुलभा गायकवाड, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस सहआयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी घटनास्थळी भेट देऊन पीडितांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. नागरिकांनी एकापाठोपाठ एक येत आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्याने वातावरणात शांतता आणि दुःख पसरले होते.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान संतप्त नागरिकांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि सर्व पाकिस्तानी उत्पादनांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली. अनेकजण भावुक होऊन फडणवीस यांना म्हणाले, “फक्त तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता.” रात्री ९:०० च्या सुमारास फुलांनी सजलेल्या वाहनांमधून या तिघांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. यापूर्वी हजारो शोकाकुल नागरिकांच्या उपस्थितीत मोठी अंत्ययात्रा काढण्यात आली. “भावपूर्ण श्रद्धांजली” असे मोठे बॅनर वाहनावर लावण्यात आले होते, ज्यावर मृतांची नावे आणि छायाचित्रे होती.
ही अंत्ययात्रा डोंबिवलीतील डोमिनोज पिझ्झा, एम. जी. रोड, डोंबिवली स्टेशन (पश्चिम), कोपर रोड, कोपर ब्रिज, टंडन रोड, आर. पी. रोड या प्रमुख मार्गांवरून गेली आणि शेवटी शिव मंदिर रोडवरील स्मशानभूमीत या तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिक यावेळी आपल्या भावनांना आवरू शकले नाहीत. अंत्यसंस्कारापूर्वी भगशाला मैदानात स्मशान शांतता पसरली होती. या घटनेमुळे समुदायाला बसलेला मोठा मानसिक आघात वातावरणात स्पष्टपणे जाणवत होता. यापूर्वी, जेव्हा पार्थिव विमानतळावर पोहोचले, तेव्हा अनेक वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनी राज्याच्या वतीने पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.