लाहोर , 12 मे (हिं.स.)।पाकिस्तानी मीडियाने आणि सोशल मीडिया युजर्सनी भारतीय पायलटला पकडल्याचे दावे केले होते, पण हे दावे त्यांच्या स्वतःच्या सैन्याने फेटाळून लावले आहेत. पाक सैन्याचे अधिकारी अहमद शरीफ चौधरी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांच्या देशाकडे भारताच्या हवाई दलाचा कोणताही पायलट नाही. पाकिस्तानकडून भारतासोबतच्या लष्करी संघर्षादरम्यान दावा करण्यात आला होता की, त्यांनी भारताचा एक वायुदल पायलट पकडला आहे. भारताने हा दावा निराधार आणि हास्यास्पद ठरवला होता. आता पाक सैन्यानेही हा दावा खोटा असल्याचे मान्य केले आहे.
पायलटांना बंदी बनवल्याच्या पाकिस्तानकडून केलेल्या दाव्यांनंतर भारतीय वायुदलाने रविवारी(दि.११) स्पष्ट केले की ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेले सर्व पायलट सुरक्षितपणे घरी परतले आहेत. वायुदलाने असेही सांगितले की, त्यांनी पाकिस्तानवर अचूक हल्ले करून आपले सर्व उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. याच विषयावर रविवारी इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे डायरेक्टर जनरल अहमद शरीफ चौधरी यांना विचारणा करण्यात आली. यावर चौधरी म्हणाले, “मी स्पष्ट करू इच्छितो की आमच्या ताब्यात कोणताही भारतीय पायलट नाही. हे सर्व सोशल मीडियावर पसरलेले दावे आहेत. सोशल मीडियावर अनेक अपुष्ट गोष्टी फिरत असतात.”
पाकिस्तानमधील सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यांमध्ये असे सांगितले गेले होते की, भारतीय वायुदलाची पायलट शिवानी सिंह हिला पाकिस्तानी सैन्याने पकडले आहे. या पाकिस्तानच्या दाव्यावर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) च्या फॅक्ट-चेकिंग युनिटने स्पष्ट केले होते की कोणतीही भारतीय वायुदलाच्या महिला पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नाही. पीआयबीने हेही स्पष्ट केले की, पाकिस्तान समर्थक सोशल मीडिया हँडल्स खोटे दावे करत आहेत की भारतीय महिला वायुदल पायलट स्क्वॉड्रन लीडर शिवानी सिंह त्यांच्या ताब्यात आहे.
एअर मार्शल एके भारती यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, या मोहिमेत सहभागी सर्व पायलट सुरक्षितपणे घरी परतले आहेत. त्यांनी सांगितले, “आपण युद्धजन्य परिस्थितीत आहोत आणि नुकसान हे युद्धाचा एक भाग असतो, पण आम्ही आमची सर्व उद्दिष्टे पूर्ण केली आहेत आणि आमचे सर्व पायलट घरी परतले आहेत.” यामुळे स्पष्ट झाले की पाकिस्तानचे दावे पूर्णपणे खोटे होते. आता पाकिस्तानी बाजूकडूनही यावर अधिकृत प्रतिक्रिया आली आहे.