इस्लामाबाद , 15 मे (हिं.स.)।भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या परिस्थितीवर, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी भारताविरुद्ध बरळत आहे.आता पुन्हा एकदा आफ्रिदीने भारतावर गंभीर आरोप करत पाकिस्तानच्या विकासात भारत अडथळे आणत असल्याचे म्हंटले आहे.
“भारत विकास करत असून त्यांच्या विकासामुळे आम्ही आनंदी आहोत. भारतीय क्रिकेटही पुढे जात आहे, ही चांगली बाब आहे. पण आम्हाला रोखले जात आहे. कारण पाकिस्तान वेगाने प्रगती करत आहे. आपण पुढे जात असताना, आपल्याला थांबवलं जात आहे. भारत पाकिस्तानच्या विकासात अडथळे निर्माण करत आहे. भारताला पाकिस्तानची प्रगती पहावत नाही,” असे शाहिद आफ्रिदीने म्हटलं आहे.
शाहीद आफ्रिदी कायम भारताबद्दल गरळ ओकत असतो. याआधी आफ्रिदीने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युद्धाच्या खुमखुमीने भारताला संकटात ढकलले आहे. पाकिस्तानचा सामना करणे किती महागात पडते हे पंतप्रधान मोदींना आता कळाले असेल, असे म्हटले होते.
2003 साली शाहिद आफ्रिदी याचा चुलत भाऊ शाकिब हरकत उल अंसार हा भारतीय सैन्यासोबत अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत ठार झाला होता. तो दहशतवादी संघटनेचा कमांडर होता. बीएसएफला शाकिबकडे सापडलेल्या कागदपत्रांवरुन ही गोष्ट सिद्ध झाली होती. मात्र, तेव्हा आफ्रिदीने शाहीद हा आपला भाऊ नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळेच शाहिद आफ्रिदी भारतीय सैन्याचं द्वेष करत असल्याचे कारण सांगितले जाते.
