सोलापूर, 16 मे (हिं.स.) :होटगीरोड विमानतळाचे उद्घाटन होवून सहा महिने झाले. अद्यापही विमानसेवा सुरू झाली नाही. सत्ताधारी आणि प्रशासन केवळ गाजर दाखविण्याचे काम करत आहे. सोलापूर-गोवा विमानसेवाही सुरू होण्यास वेळ लागत आहे. 26 मे पर्यंत विमानसेवा सुरू न झाल्यास विमानतळाला प्रतीकात्मक टाळे ठोकण्याचा इशारा सोलापूर विकास मंचने दिला आहे. सोलापूर विकास मंचने शासकीय विश्रामगृहात तातडीची बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. फ्लाय 91 कंपनीने सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू करण्याबाबत सहमती दर्शविली होती. 26 मे पासून विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली होती.
परंतु 15 तारीख झाली तरी विमानसेवा सुरू करण्याबाबत कुठलीही हालचाल कंपनीने किंवा प्रशासनाने केली नाही. विमानसेवा होणार की नाही याची चर्चा सोलापुरात सुरू झाली. विमानसेवा सुरू करण्याबाबत कोणतीही हालचाल नाही हे प्रशासनाचे अपयश नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान आहे. जिल्हाधिकार्यांनी सांगितल्याप्रमाणे 26 मे रोजी विमानसेवा सुरू न झाल्यास विमानतळाला टाळे ठोकण्याचा निर्णय बैठकीत झाला. आम आदमीसाठी सोडा, खास लोकांसाठीही ही सेवा उपलब्ध नाही.
विमानतळाला टाळे ठोकरणार असल्याचे मंत्री, आमदार, खासदार आणि लोकप्रतिनीधींना कळविणार आहोत. यावेळी मंचाचे सदस्य केतन शहा, मिलींद भोसले, योगीन गुर्जर, विजय कुंदन जाधव, अॅड. दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षीरसागर, अर्जुन रामगीर, श्रीकांत अंजुटगी, घनश्याम दायमा, रमेश माळवे, प्रसन्न नाझरे, जयश्री तासगावकर, सुहास भोसले, नरेंद्र भोसले, आनंद पाटील, वासुदेव आडके, भारत पाटील उपस्थित होते. —————