कैनबरा, 16 मे (हिं.स.) : आयपीएल उर्वरित सामना उद्यापासून म्हणजेच शनिवारी (दि.१७) पासून पुन्हा सुरु होणार आहे. यासाठी मायदेशी परतलेले अनेक विदेशी खेळाडू आता भारतात परत आले आहे, तर काहीनी भारतात येण्यास नकार दिला आहे.अशातच, भारतात परत येण्यासाठी बीसीसीआयकडून दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मिशेल जॉन्सनने केला आहे. यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
मिशेल जॉन्सनने नुकताच एक लेख लिहिला आहे. या लेखात त्याने यासंदर्भातील गंभीर आरोप केले आहेत. तो म्हणाला, “क्रिकेटपटूंच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. जर मला भारतात परत जाऊन आयपीएल पूर्ण करण्याचा निर्णय घ्यायचा असेल, तर तो माझ्यासाठी सोपा असेल. मी स्पष्टपणे नकार देईन. माझ्यासाठी सुरक्षा महत्त्वाची आहे, पैसा नाही.”पुढे तो म्हणाला, “भारतात परत जायचे की नाही, हा वैयक्तिक निर्णय आहे. परत जाण्यासाठी खेळाडूंवर दबाव टाकला जात आहे.
माझ्या मते, अशा वेळी कोणावरही दबाव टाकला जाऊ नये किंवा सक्ती केली जाऊ नये, मग ते आयपीएल असो वा पाकिस्तान सुपर लीग.” दरम्यान, आयपीएल स्थगित झाल्यानंतर बहुतेक विदेशी खेळाडू आपल्या देशात परत गेले आहेत. त्यामुळे स्पर्धा पुन्हा सुरू होत असताना सर्व संघांसमोर विदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यापैकी काहींनी परत येण्याची तयारी दाखवली आहे, तर काहींनी स्पष्टपणे नकार दिला आहे. ज्या विदेशी खेळाडूंनी भारतात परत येण्यास नकार दिला,
त्यापैकी बहुतांश खेळाडू दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे आहेत.याचे कारण म्हणजे 11 जून रोजी होणारा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि इंग्लंड व वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका. अशा वेळी हे खेळाडू आपल्या संघाचा भाग असून, त्यांच्या क्रिकेट बोर्डांनी त्यांना परत जाण्यास मनाई केली आहे. बीसीसीआयने आयपीएलसाठी नवे वेळापत्रक जारी केले असून, उद्यापासून या सामन्यांना पुन्हा सुरुवात होणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार, आयपीएलचा अंतिम सामना 3 जून रोजी होणार आहे.
