नवी दिल्ली , 25 मे (हिं.स.)। जागतिक आर्थिक व्यवस्थेत भारताने आणखी एक दमदार पाऊल टाकलं आहे. जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीवीआर सुब्रमण्यम यांनी शनिवारी(दि.२४) ही माहिती दिली.
भारतासाठी सध्या अनुकूल वातावरण आहे. देशाची आर्थिक स्थिती चांगली आहे. आता आपण जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत. देशाची अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर्सची झाली आहे, अशी माहिती सुब्रमण्यम यांनी नीति आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग काउंसिलच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना दिली.
सुब्रमण्यम यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीचा हवाला दिला. यानुसार भारताची अर्थव्यवस्था जपानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी झाली आहे. आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनीच भारताच्या पुढे आहेत. जर योजना तयार करून काम करत राहिलो तर पुढील अडीच ते तीन वर्षात तिसरी अर्थव्यवस्थाही होऊ शकतो असा विश्वास सु्ब्रमण्यम यांनी व्यक्त केला.
भारताची अर्थव्यवस्था सध्या अतिशय वेगाने वाढत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार यावर्षात भारतीय अर्थव्यवस्था चीनच नाही तर अमेरिका आणि युरोपलाही मागे टाकील. या वर्षात अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर राहील असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
अहवालानुसार, भारतीय अर्थव्यवस्था यावर्षी 6.3 टक्के दराने वाढेल. जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांत हा दर सर्वाधिक आहे. चीनची अर्थव्यवस्था 4.6 टक्के, अमेरिका 1.6 टक्के, जपान 0.7 टक्के तर युरोपाची अर्थव्यवस्था 1 टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत 0.1 टक्का घसरण होण्याची शक्यता आहे असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.