बंगळुरु , 7 जून (हिं.स.) बंगळुरु क्रिकेट स्टेडियमच्या बाहेर झालेल्या
चेंगराचेंगरी प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेत केसीए अर्थाच कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे
सचिव ए. शंकर आणि कोषाध्यक्ष ई. जयराम यांनी आपल्या पदाचा राजीनमा दिला आहे.
बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सनी आयपीएलचे अजिंक्यपद अठारा वर्षांनंतर जिंकलं होतं.
त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ४ जूनला काढण्यात आलेल्या आरसीबीच्या विजयी
मिरवणूक चिन्नास्वामी स्टेडियममबाहेर चेंगराचेंगरीमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला
होता.
संयुक्तरित्या निवेदन देत या दोघांनी
आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या दोन दिवसांत घडलेल्या अनपेक्षित
आणि दुर्दैवी घटना पहाता यामध्ये आमची भूमिका खूपच मर्यादित नैतिक जबाबदारी होती. तरीही याची जबाबदारी घेत
आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की, आम्ही काल रात्री केएससीएच्या सचिव आणि
कोषाध्यक्ष पदांचे राजीनामे सादर केले आहेत.” असे या निवेदनात या दोघांनीही म्हटले आहे.
कर्नाटक क्रिकेट असोसिएशनमध्ये या घडामोडी वेगाने घडत असताना,
दुसरीकडे शुक्रवारी रात्री भाजपच्या शिष्टमंडळाने क्यूबन पार्क पोलिस ठाण्यात
तक्रार दाखल केली. आरसीबी विजयी
मिरवणूकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी आणि त्यानंतर झालेल्या गोंधळासाठी
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जबाबदार धरावे आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा
दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
आरसीबीच्या विजयी जल्लोषावेळी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाचा तपास
गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आला आहे. आरसीबी फ्रँचायझीचे
मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे आणि कार्यक्रमाचे व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार
असलेल्या डीएनए एंटरटेनमेंट मॅनेजमेंट कंपनीचे प्रतिनिधी, सुनील मॅथ्यू, किरण आणि सुमंत, ज्यांना या प्रकरणात आधीच अटक करण्यात
आली आहे, त्यांना
न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.