अमरावती, 11 जून, (हिं.स.) – अन्नत्याग आंदोलनामुळे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे वजन दोन किलोंनी घटले असून रक्तदाब (बीपी) कमी झालेला आहे. शुगर वाढलेली आहे. त्यामुळे प्रकृती खालावलेली आहे. डॉक्टरचा बच्चू कडूंना औषध घेण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनी उपचार घेण्यास ठाम नकार दिला. दरम्यान जिल्हाधिकारी आशिष येरेकर व जिल्हा पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांनीसुद्धा बच्चू कडू यांची भेट घेत त्यांना उपचार घेण्याची विनंती केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्ती केल्यानंतर बच्चू कडू यांनी रक्तदाबाची गोळी घेण्यास सुरूवात केली.
बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर व जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी भेट देऊन बच्चू कडू यांच्या मागण्यांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करीत बच्चू कडूंना उपोषण सोडवण्याची विनंती केली. मात्र बच्चू कडूंनी त्यांची विनंती फेटाळली. सरसकट कर्जमाफीचा निर्णय, दिव्यांगाना सहा हजार रुपये प्रति महिना मानधन व इतर १७ मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असे बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांना स्पष्ट सांगितले. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला संपूर्ण राज्यातून पाठिंबा मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असून त्यांच्या तब्येतीची विचारणा केली आहे. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार रोहित पवार हे ११ जून रोजी गुरूकुंज मोझरी येथे असल्याची माहिती आहे.