महापालिका निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची चिन्ह – ४ सप्टेंबर पर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर
मुंबई, 12 जून (हिं.स.) – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयोगानुसार, २२ जुलै २०२५ रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर नागरिक, राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांकडून हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. राज्य सरकारने मुंबई वगळता महाराष्ट्रातील पुणे, नागपूर यासह अन्य महापालिकांच्या निवडणुकीसाठी चार सदस्यांचा प्रभाग असणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार पुणे महापालिकेत ४२ प्रभाग आणि १६५ नगरसेवक असणार आहेत.
राज्य सरकारच्या आदेशानंतर आता कोणता प्रभाग कसा होणार, प्रभाग रचना अंतिम होण्यासाठी किती महिने लागणार, त्यावरून निवडणूक कोणत्या महिन्यात होणार याचा अंदाज राजकीय कार्यकर्त्यांकडून लावला जात आहे. दरम्यान, मनपा निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा मुहूर्त ठरला असून वेळापत्रका जाहीर करण्यात आले आहे.
५ ऑगस्टपर्यंत हरकतींसाठी मुदत देण्यात आली असून, ७ ते १२ ऑगस्ट दरम्यान सुनावणी होणार आहे. अंतिम निर्णयानंतर १८ ऑगस्ट रोजी प्रस्ताव आयोगाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ दरम्यान अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल. अधिकारी कर्मचाऱ्यांना या वेळापत्रकानुसार सर्व कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे.
प्रभाग रचनेत प्रभागांचे विलीनीकरण, विलोपन किंवा नव्याने रचना होणार असून त्याचा थेट परिणाम राजकीय घडामोडींवर होणार आहे. काही प्रभाग अनुसूचित जाती-जमाती व महिलांसाठी आरक्षित होतील. यामुळे इच्छुक उमेदवार व पक्षांमध्ये हालचालींना गती मिळाल्याचे चित्र आहे.
प्रभाग रचना करण्याचा अधिकार राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे असून, त्यांच्या वतीने महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना आवश्यक आदेश देण्यात आले आहेत. संबंधित प्रशासनाने त्यावर काम सुरू केले असून, प्रभागांची निश्चिती पूर्ण होईपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होणे शक्य नाही. फक्त प्रभाग रचना नव्हे, तर आरक्षण प्रक्रिया आणि मतदार यादीचे अद्ययावतीकरण यासाठी देखील उशीर लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या आसपासच निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची चिन्ह आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील महापालिकांच्या प्रभाग रचनेसंदर्भातील आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. या आदेशानुसार, मुंबई महानगरपालिका ही जुन्याच 227 एकसदस्यीय प्रभागांनुसार कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचाच अर्थ, मुंबईमध्ये निवडणुका जुन्या रचनेनुसारच होणार आहेत. पूर्वी मुंबई महापालिकेमध्ये 227 प्रभाग होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रभाग वाढवून 236 करण्यात आले होते. मात्र, महायुती सरकारने पुन्हा त्याची संख्या घटवून 227 केली. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते, परंतु न्यायालयाने ती याचिका फेटाळल्याने मुंबईमध्ये 227 प्रभाग कायम राहणार आहेत. तर पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, नवीमुंबई, पिंपरी चिंचवड, छ. संभाजीनगर, यासह इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत.
अ वर्ग महानगरपालिका – पुणे, नागपूर
ब वर्ग – ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड
क वर्ग – नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली
ड वर्ग – अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, सांगली-मिरज-कुपवाड, मिरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी आणि जालना.
ड वर्गातील महापालिकांमध्ये प्रभाग रचना करताना सर्व प्रभाग शक्यतो चार सदस्यांचे ठेवण्याचे निर्देश आहेत. मात्र, गणित जुळवताना हे शक्य न झाल्यास, एखादा प्रभाग तीन किंवा पाच सदस्यांचा असू शकतो, अथवा दोन प्रभाग तीन सदस्यांचे करण्यात येऊ शकतात.