सोलापूर, 17 जून, (हिं.स.)। जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा झाला आहे. भीमा, सीना नदीकाठासह उपसा सिंचन योजनेवरील शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. यंदा जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात उजनी धरणातील पाणीपातळी 50 टक्के झाली आहे.
उजनी धरणात काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास 90.30 टीएमसी इतका एकूण पाणीसाठा तर 26.64 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा होता. त्याची टक्केवारी 49.72 इतकी आहे. यंदा मे महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यापासूनच उजनी धरण परिसरात पावसाने दमदार बॅटिंग केल्याने धरण 50 टक्के भरले. दौंडमधून उजनीत 11 हजार 719 क्यूसेकने पाणी येत असल्याने उजनी धरण भरण्यास मदत होत आहे.
येत्या पंधरा दिवसांत आणखी जोरदार हजेरी लावल्यास उजनी यंदा जून महिन्यातच शंभरी गाठण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी 16 जूनला उजनी धरण वजा पातळीत होते. त्यावेळी धरणात वजा 26.25 टीएमसी पाणीसाठा होता. यंदा 16 जूनला पाणी पातळी 26.6 टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षी 16 जूनला एकूण पाणीसाठा हा 37.43 टीएमसी इतका तर यंदा तो 90.30 टीएमसी इतका आहे.