इस्लामाबाद , 20 जून (हिं.स.)।ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानचा चेहरा जगासमोर आला. आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरबद्दल मोठी कबुली दिली आहे.भारताने नूरखान आणि शोरकोट हवाई तळांवर आणि इतर ठिकाणी हल्ला केल्यानंतर आम्ही युद्धबंदीला सहमती दर्शवल्याचे पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनी कबूल केले आहे. युद्धबंदींच्या प्रश्नावर इशाक दार यांनी सौदी अरेबियाचे प्रिन्स फैसल यांचाही उल्लेख केला.
“भारताने रावळपिंडीतील नूर खान आणि शोरकोट हवाई तळांवर हल्ला केला. यामुळे पाकिस्तानचा बदला घेण्याची योजना उध्वस्त झाली. भारताच्या हल्ल्याच्या ४५ मिनिटांतच सौदी राजकुमार फैसल बिन सलमान यांनी त्यांना फोन करून विचारले की, मी जयशंकर यांच्याशी बोलून पाकिस्तान युद्धबंदीसाठी तयार आहे हे सांगू का? मी लगेच यावर सहमती दर्शवली आणि हो म्हटले, कृपया जयशंकर साहेबांना फोन करा आणि त्यांना सांगा की आम्हाला युद्धबंदी हवी आहे,” असं इशाक दार यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.
ऑपरेशन सिंदूरमुळे अणुबॉम्ब हल्ल्याची धमक्या देणाऱ्या पाकिस्तानला भारतासमोर गुडघे टेकावे लागले आणि युद्धबंदीची विनंती करावी लागली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफपासून मुल्ला मुनीरपर्यंत सर्वांनी ते मान्य केले होते. आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनीही युद्धबंदीची विनंती पाकिस्ताननेच केल्याची कबुली दिली. या युद्धबंदीसाठी पाकिस्तानने अमेरिकाच नाही तर सौदी अरेबियाचीही मदत घेतली होती.
दरम्यान, भारत व पाकिस्तानमधील दोन अत्यंत बुद्धिमान नेत्यांमुळे मागील महिन्यात दोन्ही देशांतील संघर्ष थांबला, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. मात्र, ते नेते कोण हे ट्रम्प यांनी स्पष्ट केले नाही. संघर्ष थांबविण्यासाठी केलेल्या कामगिरीमुळेच मुनीर यांना व्हाइट हाउसमध्ये खास मेजवानी दिली, असेही ट्रम्प म्हणाले.