पुणे, 20 जून (हिं.स.)। जवळपास 19 हजार 700 ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या प्रपंचाचा प्रश्न असल्याने मी चेअरमनपदाची उमेदवारी जाहीर केली; मात्र त्यामुळे विरोधकांच्या पोटात का दुखतंय? असा सवाल करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांनी आपापल्या पॅनेलचे चेअरमन जाहीर करावेत, असे आव्हान दिले.
पवार म्हणाले, माळेगाव साखर कारखान्याची स्थापना 1955 मध्ये झाली. आज जवळपास 70 वर्षांचा काळ लोटला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांच्या कुटुंबाचा, त्यांच्या प्रपंचाचा प्रश्न आहे. मला साखर कारखानदारीतला मोठा अनुभव आहे. मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्याने माझ्या शब्दाला वजन आहे. बारामती तालुक्याच्या विकासाचा झंजावात आपण पाहिला आहे. माझ्या अधिपत्याखाली असलेला सोमेश्वर साखर कारखाना काही वर्षांपूर्वी अडचणीत होता, परंतु आज तोच कारखाना आता राज्यात उच्चांकी ऊस दर देणारा कारखाना म्हणून ओळखला जातो.
त्याच पद्धतीने माळेगावचा नावलौकिक राज्यात मोठा आहे.आपल्या सत्ताधारी संचालकांनी मागील पाच वर्षांत सातत्याने उच्चांकी ऊस दर दिला आहे, असे असताना विरोधक चुकीच्या पद्धतीने आरोप करून कारखान्यावर कर्ज असल्याचा अपप्रचार करतात; मात्र जर कर्ज असते तर राज्यातील खासगी आणि सहकारी अशा जवळपास 200 साखर कारखान्यांपेक्षा मागील गाळप हंगामाच्या उसाच्या उचलीपोटी माळेगावने सर्वात जास्त अॅडव्हान्स दिला आहे, अजून फायनल पेमेंट दिले नाही.
—————