मुंबई, 24 जून (हिं.स.)।
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ८४व्या वर्धापन दिन कार्यक्रमात पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल निवडक पत्रकारांचा विविध पुरस्काराने गौरव करण्यात आला. इंडिया टुडे वृत्तवाहिनीचे सल्लागार संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या हस्ते हे पुरस्कार यंदा प्रदान करण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी, विद्याधर दाते यांच्यासह एबीपी माझाचे सुरज सावंत आणि दै. पुण्यानगरीचे काशिनाथ म्हादे (शोधपत्रकारिता), छायाचित्रकार प्रदीप धिवार व मुद्रीतशोधक बाबी तथा शिवराम मांजरेकर यांचा पुरस्कारविजेत्यांमध्ये समावेश होता. रोख रुपये १०,०००/-, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप होते. वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या ३७ ज्येष्ठ पत्रकारांनाही या वेळी संघाचे सन्माननीय सदस्यत्व, मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
पत्रकारितेच्या मूल्यांचा सतत जागर हाच खरा पुरस्कार – राजदीप सरदेसाई
पुरस्कार वितरणानंतर प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करताना ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी सध्याच्या राजकीय व प्रसारमाध्यम क्षेत्रातील बदलांवर परखड भाष्य केलं. “पूर्वी नेत्यांविरुद्ध बातमी दिली की ते नाराज होत; पण पुन्हा संवाद करत. मात्र आता जर कोणी राजकीय टीका केली, तर त्याला देशद्रोही ठरवले जाते. ही गोष्ट पत्रकारितेसाठी धोकादायक असली, तरीही ही व्यावसायिक लढाई अजूनही सुरू आहे आणि पत्रकारिता जिवंत आहे. विशेषतः मुंबईसारख्या शहरात पत्रकारांची एकजूट ही खूप मोठी ताकद आहे,” असे ते म्हणाले.
गेली अनेक वर्षे राजकीय पत्रकारितेत सक्रीय असलेल्या राजदीप सरदेसाई यांनी आपल्या वाटचालीतील अनेक आठवणी शेअर केल्या.
“स्व. विलासराव देशमुख यांनी एकदा सांगितलं होतं की, ‘शरद पवार काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे पंतप्रधान होणार नाहीत’, आणि त्यांची ती निरीक्षणं पुढे खरी ठरली,” असे उदाहरण त्यांनी दिलं. तसेच त्यांनी सांगितलं की, “पाकिस्तान-भारत क्रिकेट सामन्याच्या वेळी शिवसेनेकडून मैदान उकरलं गेलं. त्यावर मी टीका केली. त्याचा राग स्व. बाळासाहेब ठाकरे यांना आला. पण काही दिवसांनी त्यांनी स्वतः मला बोलावून घेतले होते. विरोध आणि संवाद हे दोन्ही त्या काळात शक्य होतं.”
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही संधी – संकट नव्हे
नवीन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मत व्यक्त करताना ते म्हणाले, “पत्रकारितेत AIचा वापर वाढतो आहे. त्यामुळे नोकऱ्या जातील अशी भीती व्यक्त होते, पण ती निराधार आहे. उलट AIचा उपयोग संधी म्हणून करून पत्रकारांनी त्याचा अभ्यास करावा. ज्यांना शिकायचं आहे, तेच टिकतील.”
कार्यक्रमात पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी संघाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पत्रकार संघाचे लोणावळा येथील विश्रामधामाचे स्विमिंगपुलसह थ्रीस्टार नुतनीकरण करण्यात येणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी प्रास्ताविक केले.
संघाच्या उपाध्यक्ष श्रीमती स्वाती घोसाळकर यांनी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आणि उपस्थित पत्रकारांचे आभार मानले. कार्यक्रमास संघाच्या सदस्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती, आणि हा कार्यक्रम पत्रकारांमधील बंधुता व सन्मानाचा उत्सव ठरला.
पुरस्काराचे यंदाचे मानकरी :
शोधपत्रकारितेसाठी दिला जाणारा ‘पद्मश्री यमुनाताई खाडिलकर स्मृती पुरस्कार’ : श्री. सूरज सावंत/ श्री. काशिनाथ म्हादे (विभागून).
वृत्तपत्रात काम केलेल्या ज्येष्ठ मुद्रितशोधकास दिला जाणारा ‘कविवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर’ पुरस्कार : श्री. शिवराम मांजरेकर.
सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केल्याबद्दल दिला जाणारा ‘समतानंद अनंत हरि गद्रे’ पुरस्कार : श्री. प्रकाश कुलकर्णी
वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून प्रदीर्घ कामगिरीबद्दल दिला जाणारा ‘अ?ॅड. अधिक शिरोडकर पुरस्कृत तोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्रकार’ पुरस्कार : श्री. प्रदीप धिवार
ज्येष्ठ पत्रकार/संपादकास दिला जाणारा ‘युगारंभकार, सर्वोदयी कार्यकर्ते मधुसूदन सीताराम रावकर स्मृती पुरस्कार’ : श्री. विद्याधर दात