इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्यास भोसकले
अहिल्यानगर , 26 जून (हिं.स.)।अहिल्यानगरमध्ये घरासमोर क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादाच्या रागातून अवघ्या आठवी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. हि घटना बुधवारी (दि.२५) दुपारी साडे 3 वाजेच्या सुमारास घडली. या हत्येच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती असलेल्या सीताराम सारडा विद्यालयातील ही घटना आहे. दोन्ही विद्यार्थी एकाच भागात राहणारे आहेत. क्रिकेट खेळाच्या करणावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं. शाळेत जेवणाच्या सुट्टीमध्ये दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू झालं. यात आठवीतील विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दहावीतील विद्यार्थी गंभीर जखमी झाला.
त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असतानाच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी मुलगा शाळेतच थांबून होता. त्याचे पालकही शाळेत आले होते. नंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपी व त्याच्या मित्राला ताब्यात घेतले.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आठवीच्या मुलाकडे शाळेत चाकू कसा आला? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून पोलिसांच्या कारवाईकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.