पुणे, 27 जून (हिं.स.)।
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर या तीन एकेरी अतिरिक्त आषाढी रेल्वे सोडण्याचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर विविध स्थानकांवरून सध्या ८३ आषाढी विशेष गाड्या धावत आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.मध्य रेल्वेकडून आषाढी एकादशीचे औचित्य साधून दर वर्षी अतिरिक्त गाड्या सोडल्या जातात. अनेक भाविक रेल्वेने पंढरपूरला जातात, तर काही भाविक, पालखी सोहळा ज्या ठिकाणी पोहचला आहे,
तेथून वारीत दाखल होतात. यंदा मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवरून ८३ आषाढी विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. आता मध्य रेल्वे नव्याने आणखी तीन अतिरिक्त विशेष आषाढी रेल्वे सोडणार आहे.पुणे रेल्वे स्थानकावरून ८ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त विशेष रेल्वे साेडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दोन वातानुकूलित डबे, १० आरामदायी, द्वितीय श्रेणीतील दोन आणि चार सामान्य अशी गाडीच्या डब्यांची रचना असणार आहे. भाविक, वारकऱ्यांना इच्छितस्थळी जाण्यासाठी ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.