सोलापूर, 28 जून (हिं.स.)।
पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात… शेतीची सर्व कामे आटोपलेली… मनात विठुरायाच्या दर्शनाची आस… प्रथेप्रमाणे पंढरीस वारी पोहोच करण्याची पिढ्यानंपिढ्याची परंपरा… अशा सर्व सकारात्मकतेमुळे यंदा आषाढी यात्र सुमारे 22 ते 25 लाख भरेल, असा अंदाज पंढरपुरात व्यक्त होत आहे. या दरम्यान, प्रत्येक मिनिटाला सुमारे साठ भाविकांना विठुरायाचे दर्शन होईल. अशा पद्धतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने नियोजन केले आहे.
आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा 6 जुलै रोजी साजरा होत आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी यात्रा मोठी भरण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासन भाविकांना अत्यावश्यक सेवा सुविधा पुरविण्यासाठी तयारी सुरू आहे.
सध्या मंदिर समितीकडून तिरुपती बालाजीच्या धर्तीवर टोकन दर्शन पास देऊन भाविकांना जलद दर्शन देण्याची व्यवस्था सुरू केली आहे. टोकन दर्शनाची चाचणी घेण्यात येत आहे. 1800 भाविकांना दररोज टोकन पास दर्शन मिळत आहे. मात्र, आषाढी यात्रा कालावधीत भाविकांची दर्शन रांगेतील गर्दी विचारात घेता टोकन दर्शन चाचणी थांबवण्यात येणार आहे.