मुंबई, 30 जून (हिं.स.) – इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लहान मुलांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मराठी माणसाच्या एकजुटीने हाणून पाडला. हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे आणि त्याबद्दल तमाम मराठी जनांचं मनापासून अभिनंदन. त्यामुळे येत्या ५ तारखेला मोर्चा निघणार नाही, तर त्याऐवजी विजयी मेळावा होईल. या मेळाव्यात कोणताही झेंडा नसेल, हा मराठी माणसाचा मेळावा असेल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले. बाकी 5 तारखेच्या विजयी मेळाव्याचे तपशील लवकरच कळवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. हिंदी सक्ती विरोधातील अध्यादेश मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आज (सोमवार) ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.
ठाकरे पुढे म्हणाले, हा विषय काही श्रेयवादाचा नाही. मात्र हा विषय समोर आल्यानंतर आम्ही त्याला विरोध केला. मागच्यावेळी पाठवलेली तिन्ही पत्रे मी वाचून दाखवली होती. आम्हाला उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी पाठिंबा दिला. 5 तारखेला आम्ही मोर्चाचे आयोजन केले होते. हा मोर्चा निघाला असता तर न भुतो न भविष्य निघाला असता. संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता. सरकारला मराठी माणसाची ताकद कळाली असती.
काल मला संजय राऊत यांचा फोन आला होता. ते म्हणाले काय करायचं पुढे. म्हटलं मोर्चा तर रद्द करावा लागेल. ते म्हणाले विजयी मेळावा घ्यायचा का? ५ तारखेला घेऊ का म्हणाले. म्हटलं घ्या. पण ठिकाणं ठरवू नका. सहकाऱ्यांशी बोलून मेळावा घेऊ. तेही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी बोलतील. मेळावा झाला तरी त्याला पक्षीय लेबल लावू नका. तुम्हीही लावू नका. वर्तमानपत्रे आणि चॅनलने हा विषय लावून धरला. अशा बाबत सर्व जागरूक असले पाहिजे. कुठे कुठे काय काय घडतंय हे तुम्ही सांगितलं पाहिजे. ५ तारखेच्या मेळाव्याचा निर्णय कुठे होईल हे लवकरच सांगू.
यावेळी राज ठाकरेंना ठाकरे बंधू एकत्र येऊ नये, म्हणून हा निर्णय रद्द करण्यात आला का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ठाकरे म्हणाले, तुम्ही मोर्चाला पक्षीय लेबल लावू नका. विजयी मेळावा झाला तरी लेबल लावू नका. युती आघाडी, निवडणुका येत जातील, पण मराठी भाषा संपली की परत येणार नाही. भाषा ही संस्कृती टिकवते. तीच मुळाशी गेली तर युती आघाड्यांना काय अर्थ आहे. युती आघाडीचा विचार आता करून चालणार नाही. या गोष्टीकडे संकट म्हणून पाहावं, त्याला राजकीय लेबल लावू नये. उद्या मेळावा वगैरे काय घ्यायचा असेल तर मी तुम्हाला कळवेन. कोणताही अजेंडा नसेल. आधीच सांगितलं. मग नरेटिव्ह त्यांनी सेट केला की आम्ही. अजित पवार यांनीही विरोध केला. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे ना, असेही ते म्हणाले.