नवी दिल्ली, १६ ऑगस्ट – भारत सरकारने चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या भारत दौऱ्याची अधिकृत पुष्टी केली असून, या दौऱ्यात भारत-चीन सीमा वादावर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. वांग यी १८ ते १९ ऑगस्टदरम्यान भारतात येणार असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांच्या निमंत्रणावर हा दौरा होत आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, वांग यी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान भारत-चीन सीमा प्रश्नावर दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींमध्ये चोवीसाव्या फेरीची बैठक होणार आहे. या चर्चेत भारताचे प्रतिनिधित्व अजित डोभाल करतील, तर चीनकडून वांग यी सहभागी होतील. याशिवाय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर देखील वांग यी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या दौऱ्याची पुष्टी केली आहे. त्यांच्या निवेदनानुसार, चीन-भारत सीमा प्रश्नावर विशेष प्रतिनिधींची ही चोवीसावी फेरी असणार आहे.
हा दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा रशियाकडून तेल खरेदी करताना अमेरिका भारतावर ५० टक्के टॅरिफ लावले आहे. भारताने या निर्णयाला अन्यायकारक म्हटले असून, एनएसए डोभाल यांनी नुकताच रशियाचा दौरा करून त्यानंतर वांग यी यांना भारतात आमंत्रित केले होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान चीनमधील तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) वार्षिक परिषदेत सहभागी होणार आहेत. मोदी यांचा मागील चीन दौरा २०१८ मध्ये झाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये शी जिनपिंग भारतात आले होते. पूर्व लडाख सीमावादानंतर तणाव निर्माण झाला असला तरी गेल्या वर्षी रशियातील कजान येथे मोदी-जिनपिंग भेटीनंतर संवाद पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.