नाशिक, 5 सप्टेंबर।
मराठा आरक्षणाच्या संदर्भात शासनाच्या निर्णयाबाबत संभ्रम असून, ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या अनेक संघटना, वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन देणे, मोर्चे काढणे, रोष व्यक्त करीत आहेत. परंतु सध्याचे सणासुदीचे दिवस पाहता शांतपणे आपले म्हणणे सरकारी दरबारी नक्की मांडावे मात्र उपोषण, मोर्चे, शासकीय कागदपत्रे फाडण्याचे प्रकार तात्काळ थांबवावे असा सल्ला ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी संघटनांना दिला आहे.
समाजमाध्यमातून भुजबळ यांनी संवाद साधला असून, त्यात शासन निर्णयाबाबत ओबीसींच्या इतर नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यासाठी कायदेतज्ज्ञ, वकील यांचे मते घेत आहोत. आवश्यक असेल तर उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च नायायालयात जाण्याची आपली तयारी आहे. यात काय बदल आहेत ते तपासणे आवश्यक असून, त्यासाठी सविस्तर चर्चा करावी लागेल. तसेच सध्या राज्यात गणेशोत्सव सुरू असून गणेश विसर्जन जवळ आले आहे. आपल्या अनेकांच्या घरी गणपती आहेत, या निमित्ताने सुरू असलेल्या कार्यक्रमांमध्ये अनेक कार्यकर्ते, जनता व्यग्र आहे. पुढे शनिवार, रविवारच्या सार्वजनिक सुट्टया आहेत. या सर्वांचा विचार करून कदाचित येत्या सोमवार किंवा मंगळवारपर्यंत न्यायालयात जाण्याचा विचार करत आहोत. या शासन निर्णयामुळे ओबीसींचे नुकसान होत आहे, असे वकील व कायदेतज्ज्ञ यांच्यामार्फत निष्पन्न झाल्यानंतर आणि त्यासंदर्भात न्यायालयात जाण्याची आवश्यकता दर्शविल्यानंतर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आपली तयारी आहे. तो पर्यंत सर्वांनी शांतता राखावी, असेही भुजबळ यांनी आवाहन केले आहे.