धाराशिव, 4 ऑक्टोबर। धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांसाठी कोटक बँकेने सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सीएसआर) माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते ५००० जीवनावश्यक वस्तूंच्या किट असलेल्या वाहनास हिरवा झेंडा दाखवून या मदतकार्याचा शुभारंभ करण्यात आला.
धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागांना या उपक्रमाचा थेट लाभ मिळणार आहे. यामध्ये अंतरगाव, तांदुळवाडी फाटा, माणकेश्वर, पिठापुरी, देवळाली, खासापुरी, कानडी तांडा वस्ती, घिसाडी समाज, ऊसतोड वस्ती, करंजा गाव कामगार, वडार वस्ती आणि डावरी समाज वस्ती या भागांतील गरजू कुटुंबांना मदत पोहोचवली जाणार आहे.
अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी राबवण्यात आलेला हा उपक्रम मानवतेचे खरे उदाहरण ठरला आहे. या मदत वाटप कार्यक्रमावेळी गावातील ग्रामस्थ, शेतकरी बांधव आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी कोटक बँक, धाराशिव शाखेचे व्यवस्थापक तारीख अहमद, तसेच रामेश्वर मेंगले, गौरव राजूरकर आणि बँकेचे इतर कर्मचारी उपस्थित राहून या कार्यात सक्रिय सहभागी झाले होते.