मुंबई : मुंबई, ठाण्यासह उपनगरात ढगाळ वातावरण असून उर्वरित राज्यातील भागांमध्ये रिमझिम पाऊस असणार आहे. पुढचे तीन दिवस राज्यात उत्तर महाराष्ट्र वगळता सर्वत्र ढगाळ वातावरण आणि रिमझिक अथवा तुरळक पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडले यावेळी गारपीट होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही असा अंदाज हवामना विभागाकडून देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात पुढचे 48 तास रिमझिम पाऊस असेल तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाचा तुरळक सरी पडतील. धुळे आणि नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगावात पुढचे दोन दिवस शेतकऱ्यांना प्रशासनाकडून अलर्ट देण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* अवकाळीने शेतकरी चिंतेत
डिसेंबर महिन्यात आलेल्या या पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. झाडांना आलेला मोहोर गळून पडू शकतो. त्यामुळे शेतकरी देखील चिंतेत आहे. आधीच यंदाच्या वर्षात कोरोना त्यानंतर लॉकडाऊन आणि महापूर या सगळ्यातून बळीराजा पुन्हा उभा राहिला असताना आता अवकाळी पावसाचं संकट डोकं वर काढत आहे.
* नंदुरबार जिल्ह्यात जोर वाढला
पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली होती. नंदुरबार जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं पुन्हा जोर धरला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये डिसेंबर महिन्यात पाऊस पडत आहे. पावसामुळे थोडा गारवा पसरत असला तरी पाऊस पडून गेल्यावर खूप जास्त उकाडा वाढत आहे. राज्यात सर्वजण थंडीची आतूरतेनं वाट पाहात असताना अचानक आलेल्या या पावसानं सगळ्यांची तारांबळ उडाली आहे.