पुणे, 20 जून (हिं.स.)।
ब्राझील, फ्रान्स, इंग्लंड, स्पेन, नेदरलँडसारख्या देशांनी, तसेच भारतातील तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांनी बारामतीत सुरू असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून कृषी प्रयोगाबाबत उत्सुकता दर्शविली आहे. एका नवीन क्रांतीची सुरुवात बारामतीतून होत आहे, ही बाब महत्त्वाची आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, अटल इनक्युबेशन सेंटर, आयआयटी मुंबई, विद्या प्रतिष्ठान आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर, वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसांच्या कार्यशाळेचे उद्घाटन शरद पवार यांनी केले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, आयआयटी मुंबईचे नरेंद्र शहा, वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे अनंत कल्याणरामन, लव खोत, मायक्रोसॉफ्टच्या सपना नोरिया, डॉ. सुनील कदम, विश्वस्त डॉ. रजनी इंदुलकर, विष्णुपंत हिंगणे, डॉ. अविनाश बारवकर, राजीव देशपांडे, संस्थेचे सीईओ नीलेश नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, डेटा व्यवस्थित उपलब्ध होणे ही बाब महत्त्वाची आहे. तो नीट असेल तरच एआय तंत्रज्ञान प्रभावी ठरेल. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना परवडेल असे हवे. त्यावर चर्चा व्हावी. त्याचा उपयोग शेतकऱ्यांना निश्चितपणे होईल.याप्रसंगी वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे लव खोत म्हणाले की, वेदर स्टेशन नुसते करून चालणार नाही. त्याचा दर्जा उत्तम हवा, उपग्रहाच्या माध्यमातून मिळणारा डेटा कमी किमतीत मिळायला हवा, हवामानाचा अंदाज वर्तविण्याच्या पद्धती अत्याधुनिक व्हायला हव्यात, खासगी वेदर स्टेशन विकसित करून त्यांचा वापर व्हायला हवा.