मुंबई, 19 मार्च (हिं.स.)। मुंबई सेंट्रल येथील बीआयटी चाळीच्या पुनर्विकासाबाबत धोरणात्मक निर्णय घेतला असून पुनर्विकासाबाबतची कार्यवाही सुरू आहे असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य अमिन पटेल, अस्लम शेख यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
उदयोग मंत्री श्री. सामंत म्हणाले की, मुंबई सेंट्रल येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जमीनीवर बीआयटी चाळीच्या एकूण १९ इमारती असून त्यामध्ये १५३८ सदनिका आहेत. या इमारती १९२२ मध्ये बांधण्यात आल्याची नोंद बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे उपलब्ध आहे. त्यामधील २४१ सदनिका पोलीस आयुक्तालय, कार्यालय आणि ८० सदनिका लोहमार्ग पोलीस यांच्या ताब्यात आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका या इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठी नियमितपणे कार्यवाही करते. बीआयटी चाळीच्या पुनर्विकासाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आले असून, बृहन्मुंबई महानगरपालिका स्तरावर कार्यवाही सुरु आहे असेही उद्योग मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.