पुणे, 2 ऑगस्ट – भविष्यात शेतीला नक्कीच चांगले दिवस येतील आणि त्यासाठी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून कृषी विभागाने लोकाभिमुख पद्धतीने कार्यरत रहावे, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून ऑनलाइन पद्धतीने झाले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून दूरदृष्य प्रणालीद्वारे कृषीमंत्री उपस्थित होते. त्यानंतर घेतलेल्या कृषी विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीस कृषी आयुक्त सूरज मांढरे, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्मा प्रकल्प संचालक सूरज मडके, अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, सर व्यवस्थापक संजय शितोळे उपस्थित होते.
कृषीमंत्री भरणे यांनी कृषी विभागाची रचना, कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्रे, महाबीजसह महामंडळे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आदींचा आढावा घेतला. तसेच पीक विमा योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई), नमो किसान योजना याबाबत माहिती घेतली. त्यांनी विभागाने सर्व योजना प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवावा, असे सांगितले.
कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले की, ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेत राज्यातील १ कोटी २३ लाख ९२ हजार लाभार्थ्यांपैकी २० व्या हप्त्यासाठी ९६ लाख ५१ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी ₹२,००० प्रमाणे एकूण ₹१,९३० कोटी २३ लाख जमा करण्यात आले आहेत. दरवर्षी तीन हप्त्यात एकूण ₹६,००० शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.
पुणे जिल्ह्यातील ४ लाख ५१ हजार ८५० शेतकऱ्यांच्या खात्यात आज २० व्या हप्त्याचे ₹९० कोटी ३७ लाख जमा झाले.