अहमदाबाद, 20 जून (हिं.स.)।अहमदाबादमध्ये घडलेल्या एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २७० पैकी, आतापर्यंत २१५ मृतदेहांची ओळख डीएनए चाचणीद्वारे पटवण्यात आली असून त्यातील १९८ मृतदेह नातेवाइकांच्या हवाली करण्यात आले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.
लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया फ्लाईट एआय-१७१मध्ये २४२ प्रवासी व कर्मचारी होते. हे विमान उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच अहमदाबादच्या मेघाणीनगर भागातील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले आणि भीषण आगीत भस्मसात झाले. विमानातील एक व्यक्ती वगळता बाकी सर्व लोकांचा मृत्यू झाला. तसेच वसतिगृह परिसरातील २९ लोकही मरण पावले. दरम्यान, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी २१५ मृतदेहांची ओळख डीएनए चाचणीद्वारे पटवण्यात आली असून त्यातील १९८ मृतदेह नातेवाइकांच्या हवाली करण्यात आले आहे.
या अपघातग्रस्त विमानाबाबत एअर इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी गुरुवारी(दि.१९) सांगितले की, अपघातग्रस्त बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर या विमानाची व्यवस्थित देखभाल करण्यात येत होती. जून २०२३मध्ये त्याची बारकाईने तपासणी करण्यात आली होती. तसेच पुढील तपासणी डिसेंबर २०२५मध्ये होणार होती. विमानाचे उजवे इंजिन यंदाच्या वर्षी मार्चमध्ये, तर डावे इंजिन एप्रिलमध्ये तपासण्यात आले होते. तसेच उड्डाणापूर्वी या विमानात कोणताही दोष आढळून आला नव्हता.
एअर इंडिया विमानाला झालेल्या अपघाताला एक आठवडा उलटला असला तरी विमानाच्या शेपटासह अन्य अवशेषांचा ढिगारा अद्याप अपघातस्थळी तसाच पडून आहे. या दुर्घटनेच्या तपासाचे काम गुजरात सरकारकडे नसून त्यांचे अग्निशमन कर्मचारी, न्यायवैद्यकीय तज्ज्ञ केंद्राच्या यंत्रणांना मदत करणार आहेत.